लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत राज्य शासन कमी पडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, दि. १,ऑगस्ट :-

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत राज्य शासन कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चेंबूर येथे उद्यानातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

याप्रसंगी खासदार राहुल शेवाळे, आमदार मंगल प्रभात लोढा, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार प्रसाद लाड साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमत्री एकनाथ शिंदे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे योगदान आहे. त्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडला होता. अण्णाभाऊ हे एक क्रांतीकारी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या कार्याला पुढे घेवून जाण्यासाठी त्यांचे भव्य स्मारक करायचे आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे घर हे भव्य स्मारक तयार करण्याचा निर्णय तातडीने घेण्यात येईल. तसेच मागील काळात आंतरराष्ट्रीय स्मारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याबाबतही राज्य शासन कमी पडणार नाही. महामंडळाबाबतही तातडीने निर्णय घेतला जाईल. राज्यातील प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. आमचे सरकार अस्तित्वात आल्यापासून कमी वेळेत अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. आमचे सरकार हे सर्वांच असून सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार आहे. जे बोलतो ते करून दाखवणारे सरकार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे परिवर्तनवादी चळवळीचे नेते होते. त्यांच्या चळवळीची दखल घ्यावी लागली. लोकशाहीरांचे कार्य परिवर्तन घडवून आणणारे होते. २७ भाषांचे ज्ञान ही त्यांची ताकद होती. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या घराचे सुंदर स्मारक तयार करण्यात येईल. महामंडळाला चालना देण्यात येईल. प्रलंबित मागण्यांबाबत बैठक घेवून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. पुणे येथे लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक करण्याची आणि आयोगाच्या शिफारशींना मान्यता देण्याबाबतची कार्यवाही करू. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य पुढे नेण्याकरिता राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

हे देखील वाचा :- 

शेतकरी कामगार पक्षाच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रमात सहभागी व्हा : भाई रामदास जराते यांचे आवाहन…

Anna Bhau SatheCM eknath shinde