लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
औरंगाबाद, 15, सप्टेंबर :- राज्यात आमचे म्हणजे महाविकास आघाडीच सरकार असताना अनेक मोठे उद्योगधंदे राज्यात येणार होते, त्यापैकी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प ही होता. महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटक व गुजरात या ठिकाणी कंपनीने नियोजित प्रकल्पासाठी पाहणी केली होती, यामध्ये त्यांना लागणाऱ्या जमिनीच्या १०० निकषांचा विचार करता तळेगावमध्ये टप्पा क्रमांक चारमधील जागा अंतिम करण्यात आली होती. वेदांतच्या टिमने पुणे येथील तळेगाव औद्योगिक वसाहत योग्य राहील असा निर्वाळा दिला होता, मात्र राजकीय दबावापोटी ही गुंतवणुक गुजरात राज्यात गेली, हे राज्यातील उद्योग व गुंतवणुक धोरणास परवडणारे नाही, यामुळे महाराष्ट्रातील १ लाख तरुणांचा रोजगार बुडण्याची शक्यता आहे असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजीतदादा पवार यांनी औरंगाबाद विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना केले. विरोधी पक्षनेते अजीतदादा पवार हे औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. बल्क ड्रग प्रकल्पाबाबत माहिती नाही, माहिती घेतल्यावर बोलेल असेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांनी नवीन प्रकल्पासाठी आश्वासन दिले आहे, तोही प्रकल्प यावा, बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्याला प्रकल्पांची गरज आहे. अजुनही वेळ गेली नाही, ही वेळ राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची आहे, हवे तर दिल्ली जा, कॅबिनेट मध्ये काय तो निर्णय घ्या व वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात परत आणावा अशी मागणी त्यांनी केली. मविआ सरकारच्या काळात आम्ही या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला, चर्चा केल्या, महाराष्ट्रात प्रकल्प उभारणी आवश्यक असणारी इकोसिस्टम, कनेक्टिव्हिटी, मनुष्यबळ आणि राज्याचे पोषक औद्योगिक धोरण अशा सर्व गोष्टी अनुकूल होत्या. त्यामुळे हा प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाणे अपेक्षित नव्हते, आमच सरकार कमी पडले नाही असे म्हणत त्यांनी याप्रकल्पाबाबत मविआ सरकारवर होणारे आरोप फेटाळून लावले.
हे देखील वाचा :-
महाराष्ट्रात हजारो रोजगार उपलब्ध करून देणारा वेदांत प्रोजेक्ट गुजरातला वळाला..