लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर, दि. ०३ : चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रशासकीय नेतृत्वात महत्त्वपूर्ण बदल घडत, भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०१७ बॅचच्या अधिकारी वसुमना पंत यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली. नव्या नेतृत्वामुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या स्वागत समारंभात अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम व उपजिल्हाधिकारी शुभम दांडेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
वसुमना पंत यांनी २०१७ मध्ये नागरी सेवेत प्रवेश केल्यानंतर नंदुरबार येथे उपविभागीय दंडाधिकारी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात केली. आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले काम उल्लेखनीय मानले जाते.
यानंतर वाशीम जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी त्यांनी केली. फलोत्पादन संचालक, वनामती संचालक या पदांवर काम करताना त्यांनी कृषी व प्रशिक्षण क्षेत्रातही ठसा उमटवला.
नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून तसेच नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळताना त्यांनी शहरी विकासाच्या प्रकल्पांमध्ये नेतृत्व दाखवले.
अनुभवसंपन्न व कार्यक्षम प्रशासनिक अधिकारी म्हणून ओळख असलेल्या वसुमना पंत यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेला अधिक वेग आणि दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.