लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पालघर : पावसाळा सुरु होण्यास काही दिवस शिल्लक राहिले असतानाच हवामान विभागाने चक्री वादळाचा इशारा देऊन प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
त्यामुळे चक्री वादळ येण्यापुर्वीच सावधानता म्हणून “विद्युत महावितरण” कडुन वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. मात्र विक्रमगड व परिसरातील वीज पुरवठा रात्री- अपरात्री खंडीत होण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांना तसेच कोविड केअर सेंटरला याचा मोठा फटका बसत आहे.
प्रशासनाकडुन चक्रीवादळचा इशारा दिल्यानंतर शनिवार, दि. १५ मे रोजी मध्यरात्री १२ वाजता विक्रमगडची बत्ती गुल झाली व ती तब्बल १४ तासांनी म्हणजेच रविवार दि.१६ मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आली.
ही वीज आली खरी मात्र त्यामध्ये देखील सातत्य नसल्याने “मे” महिन्याचा उकाडा व डासांच्या चाव्याने नागरीकांना संपुर्ण रात्र जागुन काढावी लागल्याने “विद्युत महावितरणाच्या” विरोधात वीज ग्राहकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटु लागली आहे.
विक्रमगड शहर परिसरात अनेक ठिकाणी वीज खंडित होण्याचे प्रकार वारंवार चालु आहेत तर काही भागात रात्र- रात्रभर वीज गायब असते, तर काही भागात अत्यल्प कमी (डिम) प्रकाश ज्योताची वीज असते.
जस जसा पावसाळा जवळ आल्यावर हा अनुभव विक्रमगड वासियांसाठी नवीन राहिलेला नाही, मात्र शनिवार दि.१५ मे रोजी सोसाटयाचा वारा व तुरळक पावसाच्या सरी यामुळे भोपोली येथील जंगलातील विद्युत पोलांवर झाडे कोसळुन पोल पडल्याने दुरुस्तीसाठी तब्बल १४ तास वीज गायब झाली होती.
सध्यस्थित दिवसा वीज खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत असतात, तर रात्री-बेरात्री अधुन मधुन वीज खंडित होतच असते. त्यातच दुरुस्तीच्या नावाखाली आठवडयातील दर शुक्रवारी “महावितरण” कडुन वीज पुरवठा खंडीत केला जातो. दिवसभर वीज पुरवठा बंद ठेवुन “महावितरण” नक्की कोणती कामे करतात ? कामे करतात तर मग असे प्रकार का पुन्हा पुन्हा घडतात…? असा प्रश्न नागरिकांकडुन विचारला जात आहे..
एकीकडे वीजेमध्ये सातत्य नाही तर दुसरीकडे अगोदरच कडक उन्हांने अंगाची लाल्ही-लाल्ही होते, पाण्यापासुन हाल होतात व रात्रीची झोपही मिळत नाही. त्यामुळे सहन तरी किती करायचे अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधुन “महावितरणा” विरोधात उमटत आहेत.
“विद्युत महावितरणने” पावसाळा पूर्व कामे जोरात सुरु असल्याचा दावा जरी केला असला तरी अनेक ठिकाणी कामे अजुनही रेंगाळल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याचे ग्राहकांकडुन बोलले जात आहे.
दरवर्षी पावसाळयात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात हा विक्रमगड वासियांकरीता दरवर्षी नेहेमीचाच अनुभव राहिलेला आहे. जोरात वारा सुटल्यानंतर तात्काळ वीज पुरवठा सुरक्षितेचा उपाय म्हणुन अगर विद्युत खांब पडल्याने, झाडे विद्युत तारांवर पडल्याने खंडित होत असतो. शिवाय सध्या “महावितरणकडुन पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध कामे हाती घेतली गेली आहेत. त्यामुळे आधीच दुरुस्ती व ही कामे करण्याच्या नावाखाली वीज पुरवठा बंद ठेवला जात आहे.
अधुन मधुन नेहमीच वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याने कोविड केअर सेंटर, रुग्णालयात त्याचप्रमाणे शासकीय कार्यालयांमध्येही याचा मोठा परिणाम होत आहे. शिवाय अनेक व्यावसायिकांचे देखील मोठे नुकसान होत आहेत. उकाडयामुळे व रात्रभर विज खंडित झाल्यास नागरिकांचा जीव हैराण झाला आहे. या विजेच्या सुरू असलेल्या लपंडावामुळे शीतपेये व थंड वस्तूंची विक्री करणा-या दुकानदारांचेही हाल होत आहेत. तर घरात पाणी नसल्याने महिलांची चिड चिड होत आहे ती वेगळीच.
विक्रमगड-पावसाळा सुरु होण्याआधी महावितरणाकडुन वीज तारां जवळील झाडांच्या फांद्याची छाटणी करणे, जुन्या विद्युत तारा बदलणे, धोकादायक अवस्थेतील सामुग्रीची तपासणी करुन ती बदलणे अशी कामे होतात.
पावसाळा काही दिवसांवर येवुन ठेपला आहे तरीही देखभाल -दुरुस्तीची कामे मात्र अजुनही अपूर्ण असल्याचे दिसते. जर विजेची आताच ही गुल होण्याची अशीच परिस्थिती कायम राहिली तर मोठया पावसात, वा-यात काय विजेचे काय होईल..? असा सवाल सर्वसामान्य वीज ग्राहक विचारत आहेत.
विक्रमगड शहर परिसरात वारंवार विज खंडीत होण्याचे प्रकार घडत आहेत. आधीच कडक उन्हांळा व त्यात विज गेल्यावर अंगाची नुसती लाही लाही होत आहे. तर विजेवर चालणा-या व्यावसायिकांचेही मोठे नुकसान होत आहे. तरी महावितरणाने सदरील बाबत योग्य ती दखल घेवुन विजेचे सातत्य कायम राखण्याकरीता असलेल्या उपाया योजना कराव्यात.
प्रशांत भानुशाली
(सामाजिक कार्यकर्ते, विक्रमगड)
हे देखील वाचा :
देशात प्रथमच महाराष्ट्राने आयोजित केली अभिनव ऑनलाईन वैद्यकीय परिषद