दिल्लीच्या रोहिणी परिसरात असणाऱ्या जयपूर गोल्डन रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 20 जणांचा मृत्यू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 24 एप्रिल:- ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात शुक्रवारी 25 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, आज पुन्हा दिल्लीतील आणखी एका रुग्णालयातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. दिल्लीच्या रोहिणी परिसरात असणाऱ्या जयपूर गोल्डन रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी ऑक्सिजन न मिळाल्यानं 20 रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये आक्रोश पाहायला मिळाला आहे.
संबंधित रुग्णांच्या मृत्यूबाबत स्पष्टीकरण देताना रुग्णालय प्रशासनाने म्हटलं की, रुग्णांना 3600 लीटर ऑक्सिजनची गरज होती. पण रात्री बारा वाजेपर्यंत केवळ 1500 लीटर ऑक्सिजनची पूर्तता करण्यात आली. त्यामुळे संबंधित 20 रुग्णांचा दुर्दैवी अंत झाला आहे. जयपूर गोल्डन रुग्णालयातील मेडिकल सुप्रिंटेंडेंट यांनी न्युज 18 ला माहिती देताना सांगितलं की, या रुग्णालयात अद्याप 200 रूग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्यासाठी देखील अद्याप ऑक्सिजन उपलब्ध झालं नाही. त्यामुळे अन्य 200 रुग्णांचा जीवही टांगणीला लागला आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भीती पसरली आहे.