सल्लागार समितीतील विषाणू शास्त्रज्ञाचा शाहिद जमील यांचा राजीनामा

केंद्र सरकारची कोरोना लढ्याची पद्धत चुकीची

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, 17 मे:- मागील काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूनं अक्षरशः थैमान घातलं आहे. देशात दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. तर दिवसाला चार हजाराहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होतं आहे. कोरोना विषाणूच्या धोक्याची किंवा दुसऱ्या लाटेची पूर्वकल्पना केंद्र सरकारला देण्यात आली होती. पण सरकारची कोरोना साथ हाताळण्याची पद्धतचं चुकीची असल्याचा आरोप करत प्रसिद्ध विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमील यांनी सल्लागार शास्त्रज्ञांच्या फोरममधून राजीनामा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूनं अक्षरशः थैमान घातलं आहे. तसेच देशात वैद्यकीय सामग्रीचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे विरोध पक्षासह सामाजिक कार्यकर्ते आणि बुद्धीजीवी लोकं केंद्रसरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

संबंधित फोरम कोरोना विषाणूच्या विविध व्हेरिएंट्सचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आली होती. या फोरममध्ये देशातील प्रसिद्ध विषाणू शास्त्रज्ञांचा समावेश करण्यात आला होता. कोरोना साथीच्या लढ्यात केंद्र सरकारच्या नियोजनावर आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर जमील मागील काही दिवसांपासून प्रश्न उपस्थित करत होते. पण सरकारकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्यानं विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमील यांनी सल्लागार समितीतून राजीनामा दिला आहे. ते एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते.