लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि. १७ : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ट आणि उल्लेखनीय प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात श्री. पंडा यांनी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला.
गडचिरोली हा भौगोलिकदृष्ट्या दुर्गम जिल्हा असून १४,४१२ चौ.किमी. विस्तारात पसरलेला आहे. येथे ३८ टक्के लोकसंख्या आदिवासी असून, माडिया गोंड आणि कोलाम यांसारख्या दुर्बल आदिवासी जमाती (PVTGs) वास्तव्य करतात. ७० टक्के पेक्षा जास्त वनक्षेत्र आणि विरळ लोकवस्तीमुळे प्रशासनासाठी सेवा पोहोचवणे नेहमीच मोठे आव्हान राहिले.
या आव्हानांवर मात करण्यासाठी ‘आदी कर्मयोगी अभियान – प्रतिसाद देणारा प्रशासन कार्यक्रम’ राबवण्यात आला. तळागाळातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली. जिल्ह्यात ५५३ आदी सेवा केंद्रे स्थापन करून सुमारे ५३ हजार नागरिकांचे प्रभावी एकत्रीकरण केले गेले. प्रत्येक गावासाठी ग्राम कृती आराखडा तयार केला गेला, ज्यात शिक्षण, आरोग्य, उपजीविका आणि पायाभूत सुविधांची गरज समाविष्ट आहे.
सामुदायिक वन हक्क कायद्यांतर्गत ५.१२ लाख हेक्टरहून अधिक वनजमीन ग्रामसभांच्या व्यवस्थापनासाठी सुपूर्द करण्यात आली. ४९७ ग्रामसभांची मनरेगा अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून नोंदणी केली गेली. या योजनांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १७ विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधला.
या लोककल्याणकारी आणि परिणामकारक प्रशासकीय मॉडेलमुळे फक्त गडचिरोली जिल्ह्याची महाराष्ट्रातून निवड झाली. श्री. पंडा यांनी भारत सरकारकडे या मॉडेलचे यशस्वी सादरीकरण केले आणि दुर्गम भागातील विकासासाठी प्रशासनाची नवी दिशा ठरवली.
गडचिरोलीत हा पुरस्कार आदिवासी हितसंबंध, पायाभूत सुविधा, रोजगार आणि वन हक्क यांसारख्या योजनांमध्ये प्रशासनाच्या समर्पित कार्याची दखल असून, लोककल्याणासाठी प्रशासकीय नेतृत्वाचे यशस्वी उदाहरण म्हणून तो पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.