शेतकऱ्यांच्या न्याय-हक्काच्या लढाईत काँग्रेस नेहमीच सोबत.
शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनास हजारो शेतकऱ्यांचा सहभाग..मंत्री वडेट्टीवार
केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घाईघाईने कोणाशीही चर्चा न करता बहुमताच्या जोरावर आणलेले कृषी कायदे शेतकरी हिताचे नाहीत. या कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. हे कायदे रद्द करावेत यासाठी दिल्लीच्या सीमेवर लाखोंच्या संख्येने शेतकरी आपला हक्क मागण्यासाठी आंदोलन करीत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पाठींबा दिलेला आहे.
आंदोलक शेतकऱ्यांनी येत्या ८ डिसेंम्बर ला देशव्यापी बंदचे आयोजन केले असून आंदोलनात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी सामील होऊन या काळ्या कायद्याच्या निषेधार्थ देशव्यापी बंदला पाठिंबा देतील अशी माहिती विजय वडेट्टीवार मंत्री आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर बहुजन कल्याण यांनी दिली आहे.
यासंदर्भात बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. विधानभवनातील पक्ष कार्यालयात महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. ‘केंद्र सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्यांचा विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या सोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत आहे.