पश्चिम बंगालमधील हिंसाचाराविरोधात राज्यभर भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात येतंय.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क 05 मे :- केवळ राजकारणासाठी देशात हत्या होणार असतील आणि देशातील राजकारणी त्यावर गप्प बसून त्याला मुकसंमती देणार असतील तर हे लोकशाहीवरील सर्वात मोठं संकट आहे. पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांविरोधातील हिंसाचार हा लोकशाहीविरोधी असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. तसेच देशभरातील भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमधील कार्यकर्त्यांच्या सोबत असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या विरोधात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आंदोलन सुरु केलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा निषेध म्हणून भाजपकडून राज्यभर आंदोलन केलं जातंय. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “स्वत:ला पुरोगामी म्हणणारे पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर गप्प का आहेत. केवळ राजकारणासाठी देशात हत्या होणार असतील आणि देशातील राजकारणी त्यावर गप्प बसून त्याला मुकसंमती देणार असतील तर हे लोकशाहीवरील सर्वात मोठं संकट आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत.”
पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात काही ठिकाणी हिंसाचार झाला असून तो हिंसाचार तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घडवला असल्याचा आरोप भाजपने केला आहे.