एकाच कुटुंबातील 5 जणांनी फाशी घेत संपवलं जीवन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पटना 13 मार्च :– बिहारच्या सुपौल जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच जणांनी फाशी घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आई-वडील आणि तीन मुलांच्या सामूहिक आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचनेतून या कुटुंबानं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं समोर आलं आहे. हे प्रकरण राघोपूर ठाण्याच्या गद्दी गावातील वार्ड १२ मधील आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, मागील शनिवारपर्यंत या कुटुंबातील सदस्यांना लोकांनी पाहिलं होतं, मात्र यानंतर घरातील एकाही सदस्याला गावकऱ्यांनी पाहिलं नाही. अशात अचानक कुटुंबातील सर्वांनी फाशी घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आल्यानं सगळेच हैराण झाले.

राघोपूरच्या गद्दी गावातील लोकांनी मृत मिश्रीलाल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल बोलताना सांगितलं, की मागील दोन वर्षापासून हे कुटुंब कोळसा विकून घर चालवत होतं. आर्थिक परिस्थितीमुळे मिश्रीलालनं आपली जमीनही विकली होती. लोकांनी सांगितलं, की गेल्या काही दिवसांपासून हे कुटुंब गावातील लोकांपासून वेगळं राहायला लागलं होतं. याच कारणामुळं लोकांनीही त्यांची चौकशी करणं बंद केलं.

पोलिसांना याप्रकरणाची माहिती दिली गेली. रात्री उशिरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा हे पाचही मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत पोलिसांना दिसले. गद्दी गावातील मिश्रीलाल साह यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांनी सोबतच आत्महत्या केल्यानं जवळपासच्या परिसरातील सगळेच सदम्यात आहेत. जिल्ह्याचे एस पी मनोज कुमार यांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर एफएसएलची टीमही बोलावली. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, एफएसएल टीमच्या तपासानंतर घटनेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल. प्रशासनदेखील एकाच कुटुंबातील पाच जणांच्या आत्महत्येमुळे हैराण आहे. एस.पी म्हणाले, की संपूर्ण तपास केल्यानंतरच सत्य समोर येऊ शकेल.

गावातील नागरिकांनी सांगितलं, की मागच्या शनिवारपर्यंत या कुटुंबातील सदस्यांना पाहिलं गेलं होतं. मात्र, त्यानंतर या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला गावातील लोकांनी पाहिलं नाही. अशात शुक्रवारी रात्री अचानक पाच जणांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली.

bihar family siucide