संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं की, आपण सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे आणि कोविडमुळे अधिवेशन घेण्याबाबत सर्वाचं एकमत आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क 15 डिसेंबर :– देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पूर्णतः संपलेला नाही. या कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या भितीमुळे यंदा होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार नसल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार नसल्याचे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक पक्षांनी यंदाचे अधिवेशन न घेण्याबाबत आपले मत मांडले होते. मात्र आता हे अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारीत होणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री जोशी यांनी सांगितले.
हे पण वाचा:-Mumbai Lifeline:-जानेवारीपासून सुरु करण्याचा विचार : विजय वडेट्टीवार
दरम्यान, दिल्लीतील शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस चिघळत असताना केंद्रबिंदू असलेल्या वादग्रस्त नवीन शेतीविषयक कायद्यांवर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन घेण्यात यावं, यासाठी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी मागणी करणारं पत्र देखील दिले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन होणार नसल्याचे जोशी यांनी सांगितले आहे. त्यांनी असेही सांगितले की, आपण सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली आहे आणि कोविडमुळे अधिवेशन घेण्याबाबत सर्वाचे एकमत आहे.
दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला गेल्याची माहिती आहे. यासह देशातही कोरोनाचा कहर अद्याप जारी आहे. देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या १ कोटीच्या जवळपास पोहोचली आहे. देशात ९९ लाखांहून अधिक कोरोनाबाधित झाले आहेत.