लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
दिल्ली डेस्क 11 फेब्रुवारी:- लॉकडाऊन काळात नोकरी-व्यवसाय ठप्प होते. त्यामुळे या अवधीत शाळांच्या शुल्कमाफीबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी विनंती विविध याचिकांद्वारे करण्यात आली होती. राजस्थानमधील विद्या भवन सोसायटी, सवाई मानसिंग विद्यालयाची व्यवस्थापन समिती, गांधी सेवा सदन आणि सोसायटी ऑफ कॅथलिक एज्युकेशन इन्स्टिटय़ुशन्स यांनी याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांनी नुकताच निर्णय दिला. लॉकडाऊनमुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षातील शाळांची फी पूर्णपणे माफ होईल किंवा फीमध्ये सवलत मिळेल, या आशेवर राहिलेल्या देशभरातील पालकांना न्यायालयाच्या निकालाने मोठा धक्का बसला आहे.
सर्व पालकांना लॉकडाऊन काळातील शाळांची फी 100 टक्के भरावी लागेल. 5 मार्चपासून ही फी शाळांकडे जमा करावी लागेल. पालक सहा हप्त्यांमध्ये फी भरु शकतात. तसेच पालकांनी फी भरली नाही म्हणून मुलांचे शाळेतील नाव काढून टाकता येणार नाही. दहावी–बारावी इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी फी भरली नाही म्हणून संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास परवानगी नाकारू नये.
जर पालक आर्थिक परिस्थितीअभावी फी भरू शकत नसतील, तर ते स्वतंत्रपणे शाळा व्यवस्थापनाशी चर्चा करू शकतात. शाळा त्या पालकांच्या विनंतीचा विचार करतील. फी भरली नाही म्हणून कोणत्याही मुलाला ऑनलाईन वा ऑफलाईन क्लासपासून वंचित ठेवता येणार नाही. शाळांनी परीक्षांचा निकालही रोखून ठेवू नये.