लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
छत्तीसगड : छत्तीसगडच्या गरियाबंद, धमतरी आणि नुआपाडा विभागात सक्रिय असलेल्या उदंती एरिया कमिटीच्या सात नक्षलवाद्यांनी शस्त्रसंप देण्याचा निर्णय घेतला असून ते आत्मसमर्पणासाठी बाहेर पडले आहेत, अशी महत्त्वपूर्ण माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
समर्पणासाठी निघालेल्यांमध्ये उदंती एरिया कमांडर सुनील आणि सचिव एरिना या दोघांचा समावेश असून, दोघांवरही प्रत्येकी ८ लाख रुपयांचे इनाम घोषित आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील गट गेल्या काही वर्षांपासून गरियाबंद व नुआपाडा परिसरात सक्रिय होता.
तसेच कमिटी सदस्य लुद्रों, विद्या, नंदिनी आणि मलेश – ज्यांच्यावर प्रत्येकी ५ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. हे सर्व नक्षलवादीही आत्मसमर्पणासाठी एकत्र निघाल्याची माहिती मिळाली आहे. या गटात १ लाख रुपयांचा इनामी नक्षलवादी कांती हाही सामील असून, तोदेखील आपली शस्त्रे सोडण्यास तयार झाला आहे.
या नक्षलवाद्यांकडे एक SLR रायफल, तीन INSAS रायफल्स आणि एक सिंगल-शॉट बंदूक असल्याचे सांगण्यात आले आहे. या शस्त्रांसह ते आत्मसमर्पणासाठी रवाना झाले असून, लवकरच अधिकृतरीत्या पोलिसांच्या उपस्थितीत ते आत्मसमर्पण करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी गरियाबंद व नुआपाडा विभागात चालविलेल्या सलग मोहिमांमुळे नक्षल संघटनेतील खालच्या पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. वाढत्या दडपशाही मोहिमा, संपर्कतुटी आणि नेतृत्वातील मतभेद या पार्श्वभूमीवर हा संपूर्ण एरिया कमिटी पातळीवरील सामूहिक आत्मसमर्पणाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
या घटनेमुळे छत्तीसगड-महाराष्ट्र सीमावर्ती नक्षल मोर्च्यावर पोलिस दलाचा दबाव आणखी वाढला असून, नक्षल संघटनेतील उर्वरित कार्यकर्त्यांमध्येही शरणागतीकडे झुकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.