लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर डेस्क 11 डिसेंबर:- थॅलेसेमिया व सीकलसेल यासारखे आजार दिवेंसदिवस वाढत असून पूर्व विदर्भात त्याचा वेगाने प्रसार होतो आहे. हा आजार समुळ नष्ट करण्यासाठी व त्यावर कायमस्वरूपी इलाज म्हणून लस असावी व त्यासाठी संशोधन करण्याची गरज आहे असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. थॅलेसेमिया व सीकलसेल जनजागृती सप्ताहांतर्गत ऑनलाईन ऐजुकेशन प्रोग्राम सिरीज या चर्चासत्राचे आयोजन नागपूर येथे करण्यात आलेले होते. त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलेले होते त्यावेळेला ते बोलत होते.
यावेळेला थॅलेसेमिया व सिकलसेल विभागाचे संस्थापक व संचालक डॉ. विंकी रूगवाणी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या डॉ. विनीता श्रीवास्तव, महाराष्ट्र राज्य सिकलसेल विभागाचे डॉ.महेंद्र केंद्रे प्रामुख्याने उपस्थित होते. थॅलेसेमिया व सीकलसेल या आजारांचे रूग्ण पूर्व विदर्भात प्रामुख्याने भंडारा गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये वाढत असून ही चिंतेची बाब आहे. या आजारात रूग्णांना सातत्याने रक्तांची आवश्यकता असते. रक्ताचा तुटवडा पडू नये यासाठी सीकलसेलसाठी स्वतंत्र रक्तपेढी सुरू करता येईल का, याचा विचार करावा, रक्तदात्यांची संख्या वाढवावी, आवश्यक असल्यास स्वयंसेवी संस्थेची मदत घ्यावी, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.