लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
भाग – १
आलापल्ली, दि. १८ फेब्रुवारी : आलापल्ली वनविभागामार्फत वनौषधीची जतन तसेच उद्यान मध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यासह अधून मधून फेरफटका मारणाऱ्यांना वनातील झाडांची नावे, औषधी तत्वे, आजारावर उपचार घेण्यासाठी माहिती जनजागृती व्हावी हे उद्दिष्ट ठेऊन मोठ्या गाजावाजात आलापल्ली येथे जैवविविधता उद्यान निर्मिती करून उद्घाटन केल्यानंतर वनविभागाच्या देखरेखी अभावी हे जैवविविधता उद्यान आता अखेरची घटका मोजत असल्याचे दिसून येत आहे.
२०१४ साली आलापल्ली वनविभागाच्यावतीने आलापल्ली-चंद्रपूर मार्गावरील उपवनसंरक्षक आलापल्ली यांच्या निवासस्थानाला लागूनच खुल्या जागेवर लाखो रुपये खर्च करून जैवविविधता उद्यानाची निर्मिती करण्यात आली.
उद्यानाच्या निर्मितीमागे परिसरातील नागरिकांना विविध वनौषधीची माहिती मिळावी. सोबतच गडचिरोली जिल्ह्यातील विविध वृक्षांची माहिती व त्यांचे उपयोग जिल्ह्यात आढळणाऱ्या वन्यप्राण्यांची माहिती. जिल्ह्यातील जैवविविधतेची माहिती मिळावी सोबतच नागरिकांचे फावल्या वेळात मनोरंजन व्हावे हा उद्देश होता.
या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी, व्यायाम करण्यासाठी सुविधा बसण्यासाठी बेंचेस त्यावेळी लावण्यात आली होती. मात्र आलापल्लीकरांसाठी एकेकाळी आकर्षण असलेले हे उद्यान विभागाला आलापल्लीच्या देखरेखी अभावी सध्या अंतिम घटका मोजत आहे.
उद्यानातील बेंचेस, कचराकुंड्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. योग्य देखभाल न केल्यामुळे येथे लागवड केलेले वनौषधी गायब झाल्या असून गवतच गवत जिकडेतिकडे दिसत आहे. त्यामुळे एकेकाळी आलापल्लीकरांसाठी मनोरंजनाचे केंद्र असलेले हे उद्यान आता भकास झाल्यासारखे दिसून येत आहे.
या उद्यानाला लागूनच उपवनसंरक्षक आलापल्ली यांचे निवासस्थान आहे. त्याठिकाणी असलेले झाडे बहरत आहेत. मात्र जैवविविधता उद्यानातील हिरवळ गायब आहे. उद्यानातील हिरवेगार गवत आता दिसेनासे झाले आहे. उद्यानातील देखभाली अभावी हे गवत आता सुकून पडले आहे. वनौषधीची झाडेही आता नामशेष झाली असून झाडास समोर लावलेले फलक तेवढे शिल्लक आहे.
विकासाबाबत वनाधिकारी उदासीन?
गडचिरोली जिल्ह्यात ७६ टक्के जंगल असून सर्वाधिक जंगल अहेरी उपविभागात आहे. आलापल्ली व सिरोंचा या दोन विभागातील जंगलात मौल्यवान सागवान झाडे आहेत. जंगलावर विविध प्रक्रिया उद्योग निर्माण केल्यास या भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासाठी शासनासह वनाधिकाऱ्यांची मानसिकता सकारात्मक असणे गरजेचे आहे. मात्र अहेरी उपविभागातील अनेक वनअधिकारी काही प्रमाणात उदासीन असल्याचे दिसून येतात.
आलापल्ली वनविभागाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून बनविलेल्या जैवविविधता उद्यानाची देखभाल, संरक्षण करण्याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. सदर वनोद्यानाला आणखी विकसित करण्यासाठी आजपर्यंतच्या वनाधिका-यांकडून कोणतेही ठोस नियोजन व प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही.
हे देखील वाचा :
हे सरकार लोफर आहे – माजी ऊर्जामंत्री बावनकुडे यांची घणाघाती टीका
पुस्तक देण्याच्या बहाण्याने आलेल्या शेजारच्या तरुणाने…; त्या महिलेच्या हत्येचं गूढ उलगडलं