मुलाच्या क्रिकेट प्रेमासाठी ५ एकरची द्राक्ष बाग काढून वडिलाने बनवले राष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पंढरपूर :
राज्यात कोरोनाने थैमान घातले असून सर्वत्र लॉकडाऊन असल्याने मुलाच्या क्रिकेट प्रेमासाठी वडिलाने शेतातील ५ एकरावरील द्राक्ष बाग काढून तेथे राष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान बनविले आहे. पंढरपूर तालुक्यातील ठेकेदार बाळासाहेब सूर्यवंशी यांनी अनवली येथील आपल्या शेतात हे मैदान बनविले आहे.

सूर्यवंशी यांचा मुलगा अभियश याला क्रिकेटची खूप आवड आहे. गेल्या चार वर्षांपासून तो क्रिकेट खेळतो आहे. कोल्हापूर येथील पेठ वडगाव येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारा यश तेथेच क्रिकेट क्लब मधून कोच इम्रान पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तासंतास प्रॅक्टिस करीत होता.

                                                         क्रिकेट प्रेमी यश सूर्यवंशी

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट सुरु झाल्याने त्याला पुन्हा गावी परत यावे लागले. येथे आल्यावर सुविधा नसल्याने खेळात खंड पडू लागला आणि यशने आपल्या वडिलांकडे पुन्हा क्रिकेट खेळपट्टी बाबत हट्ट धरला. तसे वडील बाळासाहेब यांनी यापूर्वीपासून शेतात लहान खेळपट्ट्या बनविल्या होत्या मात्र मुलाचा हट्ट वाढल्याने त्यांनी शेतातील ५ एकर द्राक्ष बाग काढून तेथे राष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी व ग्राऊड बनवायला सुरुवात केली आणि पाहता पाहता हे ग्राऊंड तयार झाले. मग मुंबई येथून खेळपट्टी व ग्राऊंड वर लावायचे गवत आणून ते लावायचे काम सुरु केले आहे.

                                                    बाळासाहेब सूर्यवंशी

सूर्यवंशी यांच्या ग्राउंड वर सध्या ४ राष्ट्रीय दर्जाच्या खेळपट्ट्या, २ प्रॅक्टिस खेळपट्ट्या व दोन सिमेंट खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. येथे मजुरांकडून गवताचे लॉन तयार करायचे काम सुरु असून येत्या दोन महिन्यात हे ग्राउंड तयार होणार आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमचे पीच क्युरेटर महामुणकर यांनी थेट अनवली येथे येऊन खेळपट्टीचा पाहणी केली आणि व्यवस्थित झाल्याचे सांगितले आहे.

हे देखील वाचा :

मोठी बातमी : ‘एसईबीसी’ तील पात्र लाभार्थ्यांनाही मिळणार ‘ईडब्ल्यूएस’ चा लाभ

 

cricket play groundlead story