आता कुठल्या बिळात लपून बसलात, आशिष शेलार उद्धव ठाकरेंवर संतापले

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, दि. २६ सप्टेंबरराष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेच्या मालमत्तांवर टाकलेल्या छाप्यांविरोधात शनिवारी पुण्यात जोरदार निदर्शने करण्यात आली होती. या निदर्शनावेळी आंदोलकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वाद पेटला होता. या पार्श्वभूमीवर आता भाजपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काही सवाल विचारत कोंडीत पकडले आहे.

उद्धव ठाकरे हे पीएफआयवरील कारवाईचे समर्थन ही करायला तयार नाहीत आणि पाकिस्तान झिंदाबादचा निषेध ही करत नाहीत! आता कुठल्या बिळात बसला आहात?, असा जळजळीत सवाल भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरेंना विचारला आहे.

आशिष शेलार यांनी रविवारी यासंदर्भात ट्विट करुन भाष्य केले. पीएफआयचा देशविरोधी कट उघड झाला आहे. त्यानंतर पुण्यात तर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. इतिहासातील खानांची सदैव “उचकी” लागणारे, भाजपाचा राजकीय कोथळा काढायला निघालेले, संकटे टळून गेल्यावर करुन दाखवलेचे “होर्डिंग” लावणारे, आता कुठे गेले? मर्द असल्याचे वारंवार जाहीर करणाऱ्या…हिंदुत्ववादी असल्याचा कांगावा करणाऱ्या…सतत संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमितभाई शाह यांच्यावर टीका करणारे… उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत?, अशी बोचरी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. त्यामुळे आता शिवसेना या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.

हे देखील वाचा : 

श्रमजीवी मुख्यालयात हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या स्मारकाचे अनावरण

संभाजी ब्रिगेडच्या वतीने किल्ले रायगडावर दुसऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा.

 

ashish shelarlead newsuddhav thackeray