लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई : महाराष्ट्रात सध्या ३६ जिल्हे असून कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा विभागात विभागणी केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक यादी फिरत आहे. तसंच, एक मजकूरदेखील फिरत आहे. महाराष्ट्रात पुन्हा २१ नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. शासन स्तरावरून अशी कोणतीही घोषणा अथवा निर्णय झालेला नाही आहे.
राज्यात २६ जानेवारी २०२५ रोजी नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार असून राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन होऊन २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित आहे, अशा आशयाची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या वृत्तात तथ्य नसल्याचे समोर आले आहे. राज्य शासन अद्याप असा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे.
सध्या राज्यात शासनाकडून अनेक विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांसाठी शासन दरबारातून मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो. त्यामुळे आत्तातरी नवीन जिल्ह्यांच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. नवीन जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा जिल्हा न्यायालयाच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येण्याची शक्यता आहे. सध्या शासनाची
इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची तयारी नसल्याने अद्याप तरी नवीन जिल्ह्यांचा निर्णय घेण्यात येणार नसल्याचे, जाणकारांचे म्हणणे आहे. या पोस्टमध्ये काहीही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. शासन स्तरावरून अशी कोणतीही घोषणा अथवा निर्णय झालेला नसून राज्यात काही नवीन जिल्हे प्रस्तावित असून त्याबाबतची माहिती विकीपिडीयावर अनेक वर्षांपासून दिलेली आहे. त्यातून ही माहिती उचलून फेक पोस्ट बनवण्यात आली आहे.