दिग्गज अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन.

वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते रुग्णालयात दाखल होते.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोलकाता डेस्क :-प्रसिद्ध अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन झालं असून ते 85 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे ते कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात अॅडमिट होते. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. 5 ऑक्टोबर रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

सौमित्र चॅटर्जी हे बंगाली सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते होते. सौमित्र चॅटर्जी यांनी 1959 मध्ये चित्रपट ‘अपुर संसार’ मधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. सौमित्र चॅटर्जी यांनी ऑस्कर विनिंग दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्यासोबत 14 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. सौमित्र चॅटर्जी यांचा दमदार अभिनयामुळे ते अनेक दिग्दर्शकांचे फेवरेट अभिनेते होते.

सौमित्र चॅटर्जी हे पहिले भारतीय होते, ज्यांना कलाकारांना देण्यात येणाऱ्या फ्रान्सचा सर्वात मोठा पुरस्कार Ordre des Arts et des Lettres ने गौरवण्यात आलं होतं. तसेच दादा साहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. याव्यतिरिक्त संगीत नाटक अॅकॅडमी अवॉर्ड, 7 फिल्मफेअर अवॉर्ड्स सोबतच त्यांना पद्म भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.