लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. ८ नोव्हेंबर : राज्य शासनाच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाने एक समिती गठीत करण्याचा जीआर काढला आहे. मात्र, हा जीआर अमान्य असल्याचं सांगत एसटी कर्मचाऱ्यांनी आपण संपावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. संपाच्या ११ व्या दिवशीही तोडगा न निघाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यासाठी गेल्या ११ दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. आज कोर्टात संपाबाबतची सुनावणी झाली. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मीडियाशी संवाद साधत कोर्टातील कार्यवाहीची माहिती दिली. ३६ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे आम्ही दुखवटा पाळत असून त्यासाठीच संप पुकारला आहे. हा संप फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या दुखवट्याला पोलिसी बळावर हात लावण्याचा प्रयत्न करू नका, असं सदावर्ते म्हणाले.
संप चिघळण्याची शक्यता?
दरम्यान, संपावर आजही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे संप चिघळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने गठीत केलेली समिती अमान्य असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलं. एसटी महामंडळाचं थेट राज्य शासनात विलिनीकरण केल्याचा जीआर काढण्यात यावा, अशी मागणीच एसटी कर्मचाऱ्यांनी लावून धरल्याने हा संप चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे देखील वाचा :
सीआरपीएफच्या जवानांचा सहकारी जवानांवर अंधाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यू तर तीन जवान गंभीर जखमी