लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
भगवान खैरनार , मोखाडा 18 ऑगस्ट :- मोखाड्यातील बोटोशी ग्रामपंचायती मधील मरकटवाडी येथील वंदना बुधर या आदिवासी महिलेच्या जुळ्या बालकांच्या मृत्यू ह्रदयद्रावक घटना लोकस्पर्श ने बातमी प्रसिद्ध करून समोर आणली. त्यामुळे सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषदेचे ऊपाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्यांनी मजल दरमजल कसरत करून मरकटवाडीत दाखल झाले होते. त्यांनी भौगोलिक स्थिती पाहुन बांधकाम विभागाला अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही मोखाड्यात अनेक खेड्यापाड्याना जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे तेथे आरोग्य सेवा ही पोहोचलेली नाही. अशा दुर्दम्य स्थितीत येथील आदिवासी आपले जिवन कंठीत आहेत. मोखाड्यातील बोटोशी ग्रामपंचायती मधील मरकटवाडी येथील वंदना बुधर या आदिवासी महिलेच्या जुळ्या नवजात बालकांना वेळेत व स्थानिक ठिकाणी ऊपचार न मिळाल्याने त्यांचा 13 ऑगस्ट ला मरकटवाडीतच मृत्यू झाला. त्यानंतर प्रचंड रक्तश्राव झाल्याने वंदना बुधर या प्रसुत मातेला, रस्ता नसल्याने स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट ला मुसळधार पावसात डोलीकरून पायपीट करत दवाखान्यात दाखल करावे लागले होते.
या घटनेचे भिषण वास्तव लोकस्पर्श ने बातमी प्रसिद्ध करून चव्हाट्यावर आणले होते. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आणि सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या बातमी ची दखल घेत बुधवारी 17 ऑगस्ट ला पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दराम सालीमठ, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुशी सिंग, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ दयानंद सुर्यवंशी, जिल्हा परिषद ऊपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, हबीब शेख, कुसुम झोले यांसह अन्य अधिकारी व कार्यकर्त्यांनी डोंगर दर्यातील रस्ता, कसरत करत मरकटवाडी गाठली आहे.
यावेळी येथे रस्ता तयार करण्यासाठी भौगोलिक परिस्थिती ची पाहणी केली आहे. तसेच बोटोशी येथुन या गावाकडे जाण्यासाठी एक पुलं आणि रस्ता बांधला गेला तर हे गाव मुख्य रस्त्याशी जोडले जाणार असुन त्यासाठी सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाला अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी लोकस्पर्श ला सांगितले आहे. त्यामुळे यावर्षात मरकटवाडी ला जोडणारा रस्ता दृष्टिपथात येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
हे देखील वाचा :-