उतर भारतीयाचा छटपूजा उत्सव साधेपणाने साजरा करावा असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क :– देशावर कोरोनाचं संकट असल्यामुळे प्रत्येक सण साध्या पद्धतीने साजरा करावा लागला. राज्यभर दिवाळी उत्साहात साजरी होत असली तरी कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचं पालन करत दिवाळी साजरी करावी अशा सूचना वारंवार सरकारकडून देण्यात येत आहेत. अशात उतर भारतीयांचा छटपूजा हा सणदेखील राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा होतो. पण या सणावरही कोरोनाचं सावट आहे. यामुळे सरकारने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा उतर भारतीयाचा छटपूजा उत्सव साधेपणाने साजरा करावा असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. त्या अनुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्याचे पालन करावे आणि आनंद साजरा करावा असे देशमुख यांनी म्हटले आहे.
- कोरोनाचा संसर्ग वाढू नये यादृष्टीने नागरीकांनी तलाव, समुद्राकाठी एकत्रित न येता गर्दी टाळावी. व घरीच थांबून साध्या पद्धतीनेच छटपूजा साजरी करावी.
- महानगरपालिका, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता सुरक्षा व स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
- नागरीकांनी छटपूजेदरम्यान मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे तसेच जेष्ठ नागरीक व लहान मुलांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणू नये, यासंबंधी आयोजकांनी जनजागृती करावी.
- छटपूजा कार्यक्रमाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
- कोव्हिड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहीत केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.