महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण.जम्मूमध्ये दहशतवादी हल्ल्यात अवघ्या 20 व्या वर्षी गमावले प्राण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जळगाव २७ नोव्हेंबर  : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुन्हा  एका महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आलं आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव इथला एक जवान शहीद झाला असल्याची माहिती येत आहे. आज जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात दोन जवानांना वीरमरण आलं. एक जवान चाळीसगाव तालुक्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यश दिगंबर देशमुख असं शहीद जवानाचं नाव आहे. यश हे अवघ्या २० वर्षांचे होते. अगदी वर्षभराआधीच ते सैन्यदलात भरती झाले होते. ट्रेनिंगनंतर जम्मू काश्मीर इथं त्यांना तैनात करण्यात आलं. आज दुपारी आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं. यश देशमुख यांना आधीपासूनच सैन्य दलाचं आकर्षण होतं. त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेत आणि सैन्य दलात भरती झाले होते. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

प्राप्त  माहितीनुसार, तहसीलदार अमोल मोरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मृत यश दिगंबर देशमुख शहीद झाल्याची महिती त्यांना मिळाली असून यश देशमुख यांचे पार्थिव मूळ गावी कधी आलं जाईल याबाबत अजून कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, यश यांच्या जाण्याची बातमी कळताच संपूर्ण पंचक्रोशीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शहीद जवानांच्या पार्थिवाच्या दर्शनाची आता सगळ्यांना ओढ लागली आहे. यश यांच्या बातमीमुळे पीपळगाव शोकसागरात बुडालं आहे. एकही चूल गावात पेटली नसून दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.यशच्या परिवारामध्ये भाऊ, दोन बहिणी ,आई-वडील असा परिवार आहे यश चे आई वडील गावी शेती करतात .