लोकस्पर्श न्युज नेटवर्क
चंद्रपूर, 12 एप्रिल :चंद्रपूर जिल्ह्यातील मध्य चांदा वन विभाग अंतर्गत मानोरा उपक्षेत्रच्या कक्ष क्रमांक 447 मधील रोपवाटिकेत अनोखी गोष्ट बघायला मिळत आहे. रोपवाटिकेच्या कामासाठी खोदलेल्या बोअरवेलमधून मोटर न लावता सतत पाणी वाहत आहे. मागील दहा दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. १ एप्रिलला रोपवाटिकेच्या कामासाठी बोअरवेल खोदण्यात आले होते. सुमारे 40 फूट खोदल्यावर पाणी लागले. मात्र कोणतीही मोटर न लावता त्यातून पाणी वर येऊ लागले आहे. ही बोरवेल आता कुतूहलाचा विषय ठरली आहे.
नागरिक बोअरवेल पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. बोअरवेलमधून वाहणाऱ्या पाण्याचा वापर रोपवाटिकेसाठी होणार आहे. सोबतच या जंगलातील पशू पक्षी व वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाण्याचा वापर होणार आहे. भूगर्भाच्या आतवर विविध स्तरात हजारो वर्षांपासून पाझरलेले पाणी दगडांच्या अंतर्गत दबावामुळे अशा प्रकारे बाहेर येत असल्याची शास्त्रीय माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. Hydrostatic Layer च्या दबावामुळे तयार झालेल्या विशीष्ट रचनेतून हे पाणी विनासायास बाहेर येते. चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव येथील वनविभागाच्या अन्य एका रोपवाटिकेत अशाच पद्धतीने पाणी कुपनलिकेतून बाहेर येते. मानोरा येथील घटना याच जिल्ह्यातील दुसरी घटना ठरली आहे. देशात अशा प्रकारचे जलस्रोत अभावानेच बघायला मिळतात.
हे पण वाचा :-