राज्यात मोठ्या संख्येनं नोकरभरतीला सुरुवात; पाहा कोणत्या विभागात किती पदांसाठी भरती
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क, दि. २३ जानेवारी: मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या आणि अनेक नेतेमंडळींकडून अधोरेखित केल्या गेलेल्या राज्यातील नोकरभरती प्रक्रियेला अखेर राज्यात सुरुवात झाली आहे. शनिवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबतची माहिती दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच महाविकासआघाडी सरकारनं राज्यात टप्प्याटप्प्यानं नोकरभरती प्रक्रियेस सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली होती. ज्यानंतर आता अखेर ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
राज्यातील या महाभरती प्रक्रियेअंतर्गत गृहविभागात 5 हजारहून अधिक जागांसाठी भरती होणार आहे. तर, या प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्यात 7 हजारहून अधिक पदांसाठी भरती होणार आहे. भरती प्रक्रियेअंतर्गत गृहविभागात 5 हजार 297 पदांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 231 पदांसाठी भरती होणार आहे. आरोग्य विभाग आणि गृह विभाग अशी तब्बल 13 हजार 800 पदांची पहिल्या टप्प्यांत भरती होणार आहे.
एकिकडे भरतीसाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरीही मराठा नेते मात्र तूर्तास नोकरभरती होऊ नये यासाठी आग्रही आहेत. त्यामुळं राजकीय तेढही येथे निर्माण केली जाऊ शकते. नोकरभरतीचा हा प्रश्न प्रतिक्षेत ठेवत मराठा समाज आणि इतर समाजातील पात्र उमेदवारांवर किती अन्याय करायचा याबाबत मंत्रीमंडळात चर्चा झाली आणि अखेर राज्यातील लाखो बेरोजगारांना दिलासा देणारा हा निर्णय घेण्यात आला.
28 फेब्रुवारीला आरोग्य विभागाची भरती राज्यात एकाच वेळी होणार आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी यावेळी नव्यानं अर्ज सादर करायचे नाही आहे. मराठा समाजाच्या प्रवर्गातून अर्ज केलेल्या अर्जदारांना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून नव्यानं प्रमाणपत्र घेऊन पुन्हा ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
Comments are closed.