“कुलाबा कन्व्हर्सेशन” कार्यक्रमात शहरांच्या आव्हानांवर चर्चा परवडणाऱ्या आणि पर्यावरणपूरक वाहतूकीवर भर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई दि. २ फेब्रुवारी: परवडणारी आणि पर्यावरणपूरक वाहतूक हे आपले उद्दिष्ट्य असले पाहिजे असे सांगताना विकासाची व्याख्या पर्यावरणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र शासन आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित “कुलाबा कन्व्हर्सेशन” या परिषदेत ऑनलाईन उद्घाटनपर भाषण करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. त्यांच्यासमवेत या वेळी हॅमबर्गच्या स्टेट कौन्सिलर आल्मट मॉलर, कॅलिफोर्नियाच्या ल्युटनंट गव्हर्नर एलिनाय कौनलकिस, थेरेसा शॉपर, मिनिस्टर ऑफ स्टेट, मिनिस्टरी ऑफ बेडेन-वुटमबर्ग, ख्राईस्टचर्चच्या मेयर लियान डॅलझिअल, न्यू साऊथ वेल्सच्या गव्हर्नर मार्गारेट बेझली यांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता.
या परिषदेत शहर, राज्य आणि नवी जागतिक व्यवस्था यावर चर्चा झाली. प्रारंभी , ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अक्षय माथूर यांनी प्रास्ताविक केले तर अध्यक्ष सुंजय जोशी यांनी स्वागत केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाने सगळ्या जगाचे पॉझचे बटन दाबले असले तरी आपल्याला पुढील वाटचाल कशी करावी लागणार आहे ते शिकविले आहे. कोरोनाने आपल्याला पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची ते शिकविले आहे. आज विकास सगळ्यांना हवा आहे पण कोरोना काळात आपल्याला विकासाकडे एका वेगळ्या द्रुष्टीने पाहण्याची संधी मिळाली आहे.
आज आपण परवडणाऱ्या घरांविषयी बोलतो, त्याचप्रमाणे आपल्याला आता परवडणाऱ्या आणि पर्यावरणपूरक अशा वाहतुकीविषयीही बोलावे लागेल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बेस्टच्या इलेक्ट्रिक बसेस, मेट्रो, त्याचप्रमाणे मुंबईच्या मधोमध ८०० एकर आरेचा भूभाग वनासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय याविषयी माहिती दिली. कोरोनावर औषध नसले तरी केवळ ऑक्सिजन देऊन अनेकांचे प्राण वाचले आहे त्यामुळे पुढील काळात ऑक्सिजनचे किती महत्व असणार आहे आणि पर्यावरणाची आपल्याला किती काळजी घ्यावी लागणार आहे ते समजले असेही ते म्हणाले.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून याठिकाणी समुद्र किनारे, उद्याने, गुंफा, जंगल देखील असून मुंबईतील विकासाकडे सर्वांचे लक्ष असते असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
Comments are closed.