नागपुरात ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा पुतळा जाळून केला निषेध.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर, दि. १ डिसेंबर: दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद आज महाराष्ट्रातही उमटले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर रस्त्यावर उतरले आहेत. देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा पुतळा जाळून निषेध केला. आज (1 डिसें.) सकाळी 8.00 वा. नागपूरातील बेसा चौकात ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले व केंद्र सरकार विरोधात रोष व्यक्त केला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची केंद्र सरकारने ताबडतोब दखल घेवून तोडगा काढावा, महाराष्ट्रातील शेतकरी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पूर्ण ताकदीने सोबत आहे यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
शेतकरी विरोधी कृषी विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी लाखों शेतकरी दिल्लीत 6 दिवसांपासून ठाण मांडून आहेत. पंरतु केंद्र सरकार मस्तीमध्ये आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. केंद्र सरकारने 3 दिवसात तोडगा न काढल्यास संबंध देशातील शेतकरी तर रस्त्यावर उतरतीलच… पण महाराष्ट्रातही आंदोलनाचा भडका उडवू. असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.
Comments are closed.