Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रायगडाच्या पायथ्याखाली पाण्यासाठी समारंभ घ्यावा लागतो हे दुर्दैवच – नाना पाटेकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रायगड, दि. ३ एप्रिल: रायगड जिल्ह्यातील महाड येथे असलेल्या किल्‍ले रायगडच्‍या पायथ्‍याशी पिण्‍याच्‍या पाण्‍याची समस्‍या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रायगड विकास प्राधिकरणामार्फत 21 गावांमध्‍ये पुरवल्‍या जाणाऱ्या जनसुविधा मधील  पिण्याच्या पाण्याच्या  प्रश्नावर आता  नाम फाऊंडेशनची मदत घेतली जाणार आहे.

      या २१ गावांना पिण्‍याचे मुबलक पाणी मिळावे यासाठी काय करता येईल याचा आढावा घेवून विचार विनिमय करण्‍यासाठी  रायगडच्‍या पायथ्‍याशी पाचाड येथे बैठक आयोजीत करण्‍यात आली होती.  रायगड गडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी विशेष काम करण्यात येत असून, त्याची सविस्तर माहिती यावेळी दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सुरूवातीला दोन गावे निवडून ती मॉडेल गावे म्‍हणून तयार करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला व या भागातील पाण्‍याचे नैसर्गिक स्‍त्रोत शोधून त्‍याचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.

नाना पाटेकर यांनी आपल्या भाषणामध्ये “कोणतेही काम करीत असताना जात, पात, धर्म पक्ष याचा विचार न करता प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. रायगडाच्या पायथ्याखाली पाण्यासाठी समारंभ घ्यावा लागतो हे दुर्दैवच.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पशाने पावन झालेल्या या भूमीत काम करण्याचे भाग्य लाभल्याने सुरुवतीला दोन गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे म्हणाले”.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

” या परिसरातील २१ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामस्थांना सोबत घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे , त्याचप्रमाणे शिवकालीन जलखोत पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे ” खा. युवराज संभाजीराजे यांनी सांगितले.

“शिवकाळातील नैसर्गिक जलखोत आणि शासनाच्या योजनांचा आधार देत या परिसरातील पाण्याची समस्या सोडविता येईल”, असा विश्वास नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केला.

“किल्ले रायगड परिसरातील गावे, वाड्या डोंगर कपारीमध्ये विखुरलेल्या असून, योजना राबवित असताना अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे. परंतु, शिवकाळातील पाण्याचे स्त्रोत शोधणे हे नामचे प्रमुख काम असल्याचे व पाण्याच्या प्रश्नाबरोबर या परिसरामध्ये प्रत्येक पर्यटकाने, शिवभक्ताने एक झाड लाऊन त्याची जोपासना करावी.” अनासपुरे यांनी सांगितले.   

       या बैठकीला नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्‍यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार सुनिल तटकरे,  पालकमंत्री आदिती तटकरे स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार माणिकराव जगताप यांच्‍यासह बांधकाम व पाणी पुरवठा विभागाचे वरिष्‍ठ अधिकारी व परीसरातील सरपंच व ग्रामपंचायतीचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते. त्‍यांच्‍याकडून पाणीप्रश्‍न सोडवण्‍यासाठी काय करता येईल याचा आढावा घेण्‍यात आला.

Comments are closed.