कल्याण रेल्वे स्थानक परिसर सुधारणा, स्मार्ट सिटी कंट्रोल सेंटरचे उदघाटन
लोकहिताची कामे विहित वेळेत प्राधान्याने पूर्ण करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 25 जानेवारी :- कल्याण डोंबिवली शहरातील सर्व पायाभूत सुविधांबरोबरच शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असलेली लोकहिताची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी शासन कटिबध्द आहे. सर्व विकासकामे जलदगतीने पुर्ण करुन लवकरात लवकर त्यांचे लोकार्पण करण्यात येईल असा विश्वास मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीकरांना दिला.
कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण रेल्वे स्थानक परिसर सुधारणा प्रकल्प पायाभरणी समारंभ तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण डोंबिवली मुख्यालयातील स्मार्टसिटी इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटरचे उदघाटन मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने झाले. कार्यक्रमस्थळी व्यासपीठावर नगरविकास, सार्वजनिक बांधकाम(सा.उ) तथा पालकमंत्री ठाणे श्री .एकनाथ शिंदे,पर्यावरण मंत्री श्री.आदित्य ठाकरे,महापौर विनिता राणे,खासदार कपिल पाटील,डॉ.श्रीकांत शिंदे, सर्व श्री आमदार रविंद्र चव्हाण,विश्वनाथ भोईर,प्रमोद पाटील,गणपत गायकवाड,बाळाजी किणीकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर,आयुक्त डॉ.विजय सुर्यवशी यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पर्यावरण मंत्री श्री.आदित्य ठाकरे म्हणाले स्मार्ट शहर विकसित करतांना समाजातील सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक आहे. लोकहिताची कामे विहीत वेळेत व मुदतीत पुर्ण करणे आवश्यक आहे. प्रशासनाने नेहमीच जनतेला चांगली कामे दाखविणे आवश्यक आहे.शहराचा विकास करताना प्रतिष्ठीत नागरिक, सामाजिक संस्था यांना एकत्रित करुन एक संघटन तयार करावे. त्यांच्याशी समन्वय साधून शहर विकासाचा आराखडा तयार करावा अशीं सूचना त्यांनी केली. कल्याण डोंबिवली शहराचा विकास झपाट्याने होतो आहे. या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे शासन कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री.एकनाथ शिंदे म्हणाले स्थानिक परिसराचा विकास वेगाने होण्यास चालना मिळत आहे. सध्यस्थितीत स्टेशन परिसरात असलेली वर्दळ तसेच होणारी गर्दी हे लक्षात घेऊन कल्याण स्टेशन परिसरातील वाहतुकीचे नियोजन करण्यात येत आहे.तसेच आजूबाजूच्या परिसराचे सुशोभिकरणं करणे हेही स्मार्ट सिटीच्या दृष्टीने आवश्यक असल्याने सर्व बाबींचा विचार करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे.यामुळे प्रवासाची तसेच फेरीवाले आणि वाहन चालक यांची सोय होणार आहे. कल्याण डोंबिवली शहरामध्ये स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत विविध प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत.आगामी काळात शहराचा विकास झपाट्याने होईल.
Comments are closed.