ऑपरेशन सिंदूर’ तिरंगा रॅलीने चामोर्शीत देशभक्तीची लाट!
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे गौरवगान; वीर जवानांना नमन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चामोर्शी : देशभक्तीचा अविष्कार आणि राष्ट्रप्रेमाचे भव्य दर्शन घडवणारी ‘ऑपरेशन सिंदूर तिरंगा रॅली’ चामोर्शी शहरात शुक्रवारी उत्साहात पार पडली. वीर जवानांच्या पराक्रमास वंदन करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील ऐतिहासिक ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेच्या यशाचे कौतुक करत ही रॅली राष्ट्रप्रेमाचा साक्षात उत्सव ठरली.
रॅलीची सुरुवात हुतात्मा स्मृती स्मारकाजवळ अभिवादनाने झाली. माजी सैनिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री व माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी उपस्थितांना संबोधित केले. “देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांना मानाचा मुजरा आणि त्यांच्या पाठिशी उभ्या राहणाऱ्या नेतृत्वाचे मन:पूर्वक अभिनंदन,” असे ते म्हणाले.
रॅली दरम्यान “वंदे मातरम्”, “जय हिंद”, “भारत माता की जय” अशा घोषणा चामोर्शीच्या रस्त्यांवर घुमल्या. बाजार चौक, वाळवंटी चौक, पोलीस स्टेशन, हत्ती गेट, भाजपा कार्यालय, बस स्टॉप मार्गे रॅलीचा समारोप हुतात्मा चौकात झाला.
सन्मान आणि प्रेरणा एकत्र..
यावेळी माजी सैनिक अरुण बुरांडे, दशरथ गव्हारे, वामन बुरे, भरत काकडे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विविध वयोगटातील नागरिक, युवक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग रॅलीमध्ये पाहायला मिळाला.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती..
या रॅलीत भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, तालुकाध्यक्षा रोशनी वरघंटे, प्रदेश सचिव रमेश भुरसे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल कुनघाडकर, युवा नेते अमोल आईंचवार, नरेश अल्सावार, श्रावण सोनटक्के, अतुल केशवार, संतोष भांडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जिल्हाध्यक्ष व माजी आमदारांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे यश हे नवीन पिढीला देशप्रेमाची प्रेरणा देणारे आहे, असे मत व्यक्त करत सहभागी सर्व नागरिकांचे आभार मानले.
Comments are closed.