Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हयात चला जाणूया नदीला अभियानांतर्गत संवाद यात्रेचे होणार आयोजन

संवाद यात्रेसाठी आराखडा सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 1 जून-  गडचिरोली जिल्हयात चला जाणूया नदीला या अभियानांतर्गत येत्या काळात संवाद यात्रा निघणार आहे. जिल्हयातील तीन नद्यांचा यात कठाणी, खोब्रागडी (सती नदीपासून) व पोहार पोटफोडी नदींचा समावेश आहे. नदीला जाणून घेणे व तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाची सुरुवात २ ऑक्टोबर 2022 रोजी सेवाग्राम येथून झालेली असून, राज्यातील ७५ नद्यांवर नदी संवाद यात्रा संपन्न होणार आहे.

या अभियानांतर्गत जिल्ह्यातून वाहणाऱ्या निवडक नद्यांबाबतची माहिती, त्यांचा प्रचार, प्रसार व इतर बाबींसाठी साहाय्य करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. दर महिन्याला या समितीची बैठक होईल. यानुसार सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गतच्या नावीन्यपूर्ण योजनांसाठी मंजूर तरतुदीच्या १० टक्के मर्यादेपर्यंत विशेष बाब म्हणून निधी खर्च करता येणार आहे. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील, उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा, राहूल मोरघडे कार्यकारी अभियंता, तहसिलदार महेंद्र गणवीर, संदीप कऱ्हाळे केव्हीके, संतोष वाकोडे उपअभियंता, गणेश परदेशी उपअभियंता, नदी समन्वयक डॉ.सतिश गोगुलवार, नदी समन्वयक प्रकाश अर्जूनवार, मनोहर हेपट नदी समन्वयक तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गेल्या काही वर्षातील पर्जन्याच्या विचलनामुळे कधी अनावृष्टी तर कधी अतिवृष्टी होत आहे. परिणामी पूर आणि दुष्काळ यासारख्या समस्या वारंवार भेडसावत आहेत. यामुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होतो आहे. वाढते नागरीकरण, आणि औद्योगीकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढला आहे. प्रदूषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भू-पृष्ठजलाची उपयुक्तता घटत आहे. नद्यांमध्ये, जलाशयामध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन क्षमता व साठवण क्षमता कमी झालेली आहे. या सर्व बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करणे आवश्यक आहे. यासाठी जनजागृती अभियानातून जिल्हयात संवाद यात्रा निघणार आहे. यासाठी आवश्यक निधीकरीता सविस्तर प्रस्ताव व आराखडा तातडीने सादर करण्याचे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी दिले.

अभियानाचे उद्दिष्ट : नदी संवाद अभियानाचे आयोजन करणे. जनसामान्यांना नदीसाक्षर करण्याबाबत उपाययोजना आखणे. नागरीकांच्या सहकार्याने नदीचा सर्वंकष अभ्यास करणे व त्याबाबतचा प्रचार व प्रसार करणे. अमृत वाहिनी बनविण्यासाठी मसुदा तयार करणे. नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार व प्रसार रुपरेषा आखणे. नदीचा तट, प्रवाह जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्हयात प्रचार-प्रसार याबाबत नियोजन करणे, नदी खोल्यांचे नकाशे, नदीची पूर रेषा, पाणलोट क्षेत्राचे नकाशे, मातीचे क्षरण, पर्जन्याच्या नोंदी, मागील पाच वर्षातील पूर आणि दुष्काळाच्या नोंदी याबाबतची माहिती संकलित करणे. पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजल स्तर उंचावणे, जनजागृती करणे. अतिक्रमण, शोषण आणि प्रदूषण या तीन प्रमुख कारणांचा अभ्यास व त्याचा परिणाम अभ्यासणे. नदी संवाद यात्रा आयोजित करण्याबाबत आराखडा तयार करुन अंमलबजावणी करणे, नदी, समाज आणि शासन यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करणे.

 

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.