Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामातील ‘महाभ्रष्टाचार’ थांबवा : शेतकरी कामगार पक्षाचा इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली २९ ऑगस्ट :सिरोंचा – गडचिरोली – आरमोरी असा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ (सी) चे जिल्ह्यात बांधकाम सुरू आहे. सदरच्या बांधकामाचे कंत्राट असलेल्या कंपनी विरोधात यापूर्वी अनेकदा, अनेकांनी तक्रारी आणि आंदोलनांची भुमिका जाहिरपणे घेतलेली असतांनाही आपण या महामार्गाच्या बांधकाम आणि बांधकाम करणाऱ्या कंपनीकडे ‘अर्थपूर्ण’दुर्लक्ष करून महामार्गाच्या ‘ महाभ्रष्टाचाराला’ वाव दिलेला असून सदर कंपनी विरोधात तात्काळ कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावरचा आणि न्यायालयात आपल्या आणि बांधकाम कंपनीच्या विरोधात लढाई लढू,असा इशारा शेतकरी कामगार पक्षाने राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते,जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे,महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, शेकाप युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर,विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई सुनील कारेते यांनी कार्यकारी अभियंत्यांना लिहिलेले हे पत्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे,रस्ते वाहतूक विभागाचे केंद्रीय सचिव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकण ( रस्ते विकास) चे महासंचालक आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांनाही मेल द्वारे पाठविण्यात आले आहे.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदरच्या तक्रार पत्रात शेतकरी कामगार पक्षाने म्हटले आहे की, कार्यकारी अभियंता म्हणून आपण ‘अर्थपूर्ण’दुर्लक्ष केल्याने

बांधकाम कंपनीच्या कामात हेकेखोरपणा टोकाचा वाढलेला असून सायन्स कॉलेज ते गांधी चौक दरम्यान बांधल्या जाणाऱ्या  नालीलगत तिथूनच उपसलेला गाळ तिथेच वापरण्यात येत आहे. सदर बांधकामा करीता कंपनीच्या विरोधात यापूर्वीच बेकायदा रेती उपसा, मुरुम चोरी आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम याबाबत तक्रारी आणि पाठपुरावा अनेकदा अनेकांनी केलेला असतांना आपण कार्यकारी अभियंता या नात्याने सदर कंपनीला काळ्या यादीत टाकून अतिरिक्त वसुलीची कारवाई आपल्या स्तरावरुन होणे गरजेचे असतांना आपण जाणून बुजून ‘अर्थपूर्ण’दुर्लक्ष केले. त्यामुळेच महामार्ग क्रमांक ३५३(सी) च्या बांधकामात ‘महाभ्रष्टाचार’ करण्यात येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदरच्या बांधकामाचे अनुषंगाने बेकायदा रेती उत्खनन व चोरी, मुरुम चोरी, निकृष्ट गिट्टी व सिमेंटीकरण आणि नालीलगत मलब्याचा वापर यामुद्यांवर तात्काळ चौकशी लावून सदर बांधकामांचे सर्व प्रकारचे देयके थांबविण्यात यावेत. तसेच चौकशी अंती कंपनीला काळ्या यादीत टाकून अतिरिक्त रक्कमेची वसूलीची कारवाई करण्यात यावी, अशी या तक्रारीच्या माध्यमातून आपणास प्रथमतः आणि अंतिमतः विनंती करण्यात येत असून दखल घ्यावी, अशी मागणीही शेतकरी कामगार पक्षाने राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.

याउपरही सदरचा ‘महाभ्रष्टाचार’ सुरू राहिल्यास वैक्तीश: आपल्या व सदर बांधकाम कंपनीच्या विरोधात रस्त्यावरची व न्यायालयातील लढाई आम्ही लढू आणि बांधकामात निर्माण होणारे अडथळे व इतर कायदा व सुव्यवस्थेला आपण जबाबदार असाल,असा इशाराही शेतकरी कामगार पक्षाने दिला आहे.

हे देखील वाचा :

दोन वर्षांपासून सोंडो येथील बंद पथदिवे तात्काळ सुरू करण्याची युवा स्वाभिमान पक्षाची मागणी

 

 

Comments are closed.