लोकसहभागातून साकीनगट्टा गावात जलतारा व वनराई बंधारां उभारला..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी दि,२१: तालुक्यातील ग्रामपंचायत आरेंदा अंतर्गत येणाऱ्या साकीनगट्टा गावात जलतारा व वनराई बंधारा या महत्त्वाच्या जलसंवर्धन उपक्रमांचा शुभारंभ मा. सरपंच व्यंकटेश तलांडी यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या या कार्यात ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने श्रमदानात सहभागी होत ग्रामविकासातील लोकसहभागाचे प्रभावी उदाहरण घडवले.
वारलु तलांडी यांच्या शेतात जलतारा कामाचा शुभारंभ झाल्यानंतर ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नाल्यावर वनराई बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण केले. नैसर्गिक पाणीस्रोतांना बळकट करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या उपक्रमात उपस्थितांनी दिवसभर श्रमदान करत गावाच्या पाणी साठा क्षमतेत वाढ करण्यास हातभार लावला.

या वेळी ग्रामसेवक डी. पी. झाडे यांनी उपस्थितांशी संवाद साधत जलतारा व वनराई बंधाऱ्याचे महत्त्व स्पष्ट केले. शेतात पावसाचे पाणी एकत्र करून जमिनीत मुरणी वाढवण्यासाठी ५ फूट रुंद, ५ फूट लांब आणि ६ फूट खोल खड्ड्यात दगड भरून जलतारा तयार केला जातो. एका जलतारामधून तब्बल ३.६० लाख लिटर पाणी जमिनीत मुरते, ज्यामुळे विहीर-बोअरवेलचा पाणीसाठा वाढून शेतीला दीर्घकालीन फायदा होतो. मनरेगा अंतर्गत अशी कामे वाढविल्यास कुशल व अकुशल मजुरांना रोजगार उपलब्ध होईल आणि नैसर्गिक संसाधन संवर्धनालाही चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
शेतीच्या हंगामातही दैनंदिन कामातून वेळ काढून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने उपक्रम अधिक प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमास ग्रा.पं. सदस्य मुरा आत्राम, सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच बंडू आत्राम, कोतवाल रामजी आत्राम, सदस्य रामजी कुडमेथे, शिपाई नामदेव दहागावकर, ऑपरेटर दस्सा आत्राम, ग्रामरोजगार सेवक तुलसीराम आत्राम, गावातील प्रतिष्ठित नागरिक बाजीराव आत्राम, संजय तलांडी, प्रेरक बाबुराव तलांडी तसेच स्थानिक शेतकरी व गावकरी उपस्थित होते.

