लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २१ जून : रात्रीच्या सुमारास गोकुळ नगर आयटीआय बायपास मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या युवकांना काठीने मारहाण करून त्यांच्याकडून दोन मोबाइल संच व रोख दोन हजार रुपये हिसकावून पळ काढणाऱ्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात अखेर स्थानिक गुन्हे शाखेस यश मिळाले आहे.
राहुल नेताजी उंदिरवाडे, अनुराग दिनेश मिसार, ज्ञानदीप मदन गेडाम सर्व राहणार गडचिरोली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. १७ जून २०१९ रोजी फिर्यादी सावली येथील सुरज राघोबा मलवडे हा आपल्या मित्रासह रात्री १०.३० वाजता चे सुमारास गोकुळ नगर बायपास रस्त्याने आयटीआय चौकाकडे जात असतांना आरोपी राहुल नेताजी उंदीरवाडे अनुराग दिनेश मिसार, ज्ञानदीप मदन गेडाम, यांनी त्यांना रस्त्यात अडविले. त्यांना काठीने मारहाण करून त्यांच्याकडील दोन मोबाइल संच व दोन हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली.
धास्तावलेल्या सुरज याने आपल्या मित्रासह गडचिरोली पोलिस ठाणे गाठून तोंडी तक्रार दाखल केली. पोलिसांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात कलम ३९४, ३४ भादंवी अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे जबाबदारी सोपविली होती. अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विलास भुसारी यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस पथकाने आरोपींचा शोध घेण्यास सुरु केल्याने काल २० जून रोजी आरोपी राहुल नेताजी उंदिरवाडे याला वायगाव येथून व इतर दोन आरोपींना गडचिरोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून अटक केली आहे.
त्यांना पुढील कारवाईसाठी गडचिरोली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हे देखील वाचा :
चक्क! १ हजार मिटरच अंतर अवघ्या सहा मिनीटं एक सेकंदात कापलं ‘या’ चिमुकलीने
पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन सायकलने निघाली ‘ती’ महाराष्ट्र भ्रमंतीला!
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर!,आता IRCTC मधून तिकीट रद्द केल्यावर लगेच मिळणार रिफंड