लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क, दि. ३० जून : “मानवी अस्तित्वाचा शोध आणि वास्तवाचे भान लॉकडाऊनमध्ये मिळाले आहे. देशातील विविध संघटना, संस्थांनी जातीधर्माच्या, भाषेच्या पलीकडे जाऊन काम केले. या कठीण काळात माणुसकीचे दर्शन घडवले. राजकारण, हेवेदावे बाजूला ठेवत समाजातील प्रत्येक गरजू व वंचित घटकांसाठी सेवाभावी कार्य उभारले,” असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
जय गणेश व्यासपीठ व उचित माध्यम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लॉकडाऊन : वास्तव आणि साहित्यिक नोंदी’ विषयावरील परिसंवादात डॉ. सबनीस बोलत होते. कोरोना काळात मदतीचा हात देणाऱ्या सेवावृतींचा कृतज्ञता सन्मान यावेळी डॉ. सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. संजय चोरडिया, पियुष शहा, किरण सोनिवाल, विक्रांत मोहिते, भाऊ थोरात, रवींद्र भुजबळ, मयूर पोटे, विशाल ओव्हाळ आदी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “वास्तव आणि कल्पनेच्या मिश्रणातून ज्ञानेश्वर जाधवर यांनी लिहिलेली ‘लॉकडाऊन’ कादंबरी समकालीन इतिहासाची साक्ष आहे. लॉकडाऊनमधील विविध घटनांचे पडसाद, माणुसकीचे आणि अमानुषतेचे दर्शन या कादंबरीतून घडते. वास्तवाला सामोरे जाण्याचे, त्याला भिडण्याचे आणि ते अभिव्यक्त करण्याचे सामर्थ्य ज्ञानेश्वरच्या लेखणीत आहे. आजच्या निमित्ताने सन्मानित केलेल्या सेवावृत्तीचें कार्य एखाद्या नेत्यापेक्षाही श्रेष्ठ आहे.” जीवराज चोले यांनी सूत्रसंचालन केले. पियुष शहा यांनी आभार मानले.
हे देखील वाचा :
राष्ट्रीय महामार्गालगत शिकारीसाठी लावलेल्या विद्युत प्रवाहात अडकून ३ म्हशींचा मृत्यू
वनविभागाच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला मिळाले अखेर जीवदान
धक्कादायक! जन्मदात्या बापानेच तीन मुलांच्या आईस्क्रिममध्ये मिसळवलं विष, एकाचा मृत्यू