लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पुणे डेस्क, 5 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (6 मार्च) पुण्यातील मेट्रो प्रकल्पासह इतर प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा आहे. या दौऱ्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सणसणीत टोला लगावला आहे.
शरद पवार म्हणाले, माझं म्हणणं इतकंच आही की, या संकटात कुणी काय केलं काय नाही याचा विचार करण्याची गरज ही वेळ नाही. या उलट सर्वांनी एकत्र येऊन या विद्यार्थ्यांना कसं वाचवता येईल याकडे लक्ष द्यायला हवं. अपेक्षा ही आहे की, ज्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत त्यांनी यात अधिक लक्ष द्यावं. मला हे मान्य आहे की, पुण्यात काही महत्त्वाचे येतात.
जो प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून अनेक वर्ष लागतील त्याचं उद्घाटन आपण करतोय. नदी सुधार प्रकल्पाचे उद्घाटन देखील करतोय. हे प्रकल्प महत्त्त्वाचे आहेत पण या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या उद्घाटनासोबतच मुलांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणं अधिक महत्त्त्वाचं आहे असं मला वाटतं.
पुणे महानगरपालिकेतर्फे वारजे माळवाडी येथे उभारण्यात आलेल्या मल्टीस्पेशालिटी व मॅटर्निटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा शरद पवारांच्या हस्ते पार पडला. यावेळी शरद पवार म्हणाले, आज देशाचे पंतप्रधान उद्घाटनाला पुण्यात येत आहेत. काही कार्यक्रम होत असतील तक्रार करण्याचं कारण नाही. मेट्रो सुरू करतायत. एक महिन्यापूर्वी मेट्रो प्रमुखांनी मला मेट्रो दाखवायला नेलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत त्या रस्त्यावरुन मी सुद्धा गेलो. आमचे काही सहकारी सुद्धा होते आणि माझ्या लक्षात आलं की हे मेट्रोचं काम पूर्ण झालेलं नाहीये. पण ठिक आहे. मला नुसतं दाखवलं. पण उद्या उद्घाटनाला येत आहेत. काम झालं नाही तरी उद्घाटनाला येत आहेत माझी त्याबद्दलची काही तक्रार नाही.
शरद पवार पुढे म्हणाले, रशिया, युक्रेन, चीन, फिलिपीन्स या तीन चार देशांत भारतीय विद्यार्थ्यांचं शिक्षणासाठी जाणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. त्याची कारण दोन-तीन आहेत. एक म्हणजे तिथे आकारली जाणारी फी ही भारतीय खासगी संस्थांच्या तुलनेत कमी आहे. भारतात प्रवेश मिळवणं इतकं सोपं नाही आणि त्यामुळे हजारो विद्यार्थी परदेशात शिकायला जातात.
युक्रेन हा अतिशय सुंदर देश आहे. देशाचा संरक्षण मंत्री असताना युक्रेनमध्ये मी गेलो होतो. जसं पुणे शिक्षणाचं माहेरघर आहे तसेचंच युक्रेनला शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं म्हणून आपले विद्यार्थी तेथे शिक्षणासाठी जातात.
रशिया आणि युक्रेनमध्ये जो संघर्ष सुरू आहे त्याची झळ स्थानिक नागरिकांना बसत आहे. विद्यार्थ्यांना अधिक त्रास होत आहे. काही विद्यार्थ्यांसोबत माझं बोलणं झालं. परराष्ट्र मंत्रालयात बोलणं झालं. या भारतीय मुलांना परत आणण्यासाठी जे जे करण्याचा प्रयत्न करता येईल ते करत आहेत.
विद्यार्थ्यांची तक्रार अशी आहे की, राजकीय भारतीय दुतावासाने त्यांना सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर युक्रेनच्या सीमेबाहेर येता येईल असा निर्णय तुम्ही घ्या. विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की, पाच ते सहा तास चालायला लागेल इतक्या अंतरावर युक्रेनची सीमा संपून रशियाची सीमा सुरू होते. तिथे जायची आमची तयारी आहे. पण भयंकर थंडी आहे आणि पाच तास चालत जायचं त्यात गोळीबार सुरू आहे त्यामुळे चिंता वाटते असंही शरद पवार म्हणाले.
हे देखील वाचा :
युक्रेनमधल्या नागरिकांसाठी रशियाचा मोठा निर्णय, 6 तासांसाठी युद्धविराम घोषित