लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. ३० ऑगस्ट : गडचिरोली तालुक्यातल्या चुरचुरा गावात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत घडली आहे. पार्वताबाई नारायण चौधरी (५५) रा. चुरचुरा, असे मृत महिलेचे नाव आहे. दिवसेंदिवस वाघाचे हल्ले वाढत असून नागरिकांमध्ये अतिशय दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगायचे की वाघांच्या हल्ल्यात मरायचे..? असा संतप्त सवाल गडचिरोलीतील नागरिक प्रशासनाला विचारीत आहेत.
पार्वताबाई आणि त्यांचे पती नारायण चौधरी हे दोघेही गुरे चाराईचे काम करीत होते. आज सकाळी गुरे घेऊन दोघेही जंगलात गेले होते. संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास गुरांना गावाकडे परत घेऊन येताना पार्वताबाई गुरांचा मागे आणि पती पुढे चालत होते. मात्र वाघाने तीच संधी साधून मागे चालत असणाऱ्या पार्वताबाईवर हल्ला करून तिचा जीव घेतला. बराच वेळ होऊनही पत्नी येताना दिसत नसल्याचे बघून पती नारायण पत्नीला पाहण्यासाठी मागे गेले. त्यावेळी त्यांना वाघाच्या पंज्याचे ठसे आणि वाघाने कुणालातरी ओढत नेल्याच्या खुणा दिसून आल्या. हे बघताच नारायण यांनी आरडाओरड केल्यानंतर गावकरी घटनास्थळी धावून गेले. त्यावेळी गावकऱ्यांना जंगलात पार्वताबाईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी आर. बी. मडावी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटास्थळी जाऊन पंचनामा केला.
दिवसेंदिवस वाघाचे हल्ले वाढत आहेत
गडचिरोली वनविभागातील पोरला वनपरिक्षेत्रात आतापर्यंत ९ जणांचा वाघांच्या हल्ल्यात बळी गेला आहे. तर, वडसा वनविभागात येणाऱ्या आरमोरी वनपरिक्षेत्रातील आरमोरी, अरसोडासह अन्य ठिकाणी वाघाने आतापर्यंत ११ नागरिकांचा जीव घेतला आहे.
जगायचे की वाघांच्या हल्ल्यात मारायचे..?
गेल्या काही दिवांपासून गडचिरोली वन वृत्तातील वाडसा आणि गडचिरोली विभागात वाघाच्या हल्ल्यात जवळपास रोजच बळी जातायेत. शेतीच्या कामासाठी , गुरे चारण्यासाठी किंवा सायकल, मोटारसायकलने जाणारे लोक नरभक्षक वाघांचा जणू काही खुराक झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी जगायचे तरी कसे असा प्रश्न या परिसरातील नागरिक विचारत आहेत. दिवसेंदिवस वाघाच्या हल्ल्यात बळी जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे आता नागरिकांमध्ये देखील संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगायचे की वाघांच्या हल्ल्यात मारायचे..? असा संतप्त प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.
हे देखील वाचा :
मेट्रो प्रकल्प पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे