लोकस्पर्श न्युज नेटवर्क
Maharashtra Rain 30 एप्रिल :महाराष्ट्रासह देशभरात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने हा अंदाज व्यक्त केला असून, शुक्रवार 5 मे पर्यंत देशभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतात सर्वाधिक पाऊस पडेल, असा अंदाज आहे. एकीकडे पाऊस तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात वाढ झाली होती. अनेक भागात पारा चाळीशीच्या पुढे गेला होता.
एप्रिल महिन्यांत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडले आहेत. राज्यातील बुलढाणा, चंद्रपूर, सोलापूर, अमरावती, बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. यामध्ये शेती पिकांसह घरांचंही मोठं नुकसान झालं आहे. अनेकांचा संसार या वादळी पावसामुळं उघड्यावर पडला आहे.
पुढील पाच दिवस उत्तर भारतात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पावसासोबतच जोरदार वारेही वाहतील. महाराष्ट्राच्या अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारताबद्दल बोलायचे झाले तर, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकचा काही भाग, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि केरळमध्ये पुढील पाच दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :-