लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पुणे, 22 नोव्हेंबर :- कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली ईश्वर सूळ यांना तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. तर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक शामल प्रकाश पोवार-पाटील यांची चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातून विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. बदली आणि निलंबनाचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी (दि.२१) संध्याकाळी काढले आहेत.
महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली सुळ यांच्याकडे चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल तक्रार अर्जाची चौकशी देण्यात आली होती. मात्र, सुळ यांनी तक्रार अर्जाची गांभीर्याने आणि अर्जाची संवेदनशीलता लक्षात न घेता अर्जावर ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे अर्जदार यांना आरोपींकडून मारहाण करण्यात आली. यामध्ये अर्जदार यांचा मृत्यू झाला. सुळ यांनी बेजबाबदार, बेफिकीर, गैरवर्तन केल्याने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीस उपनिरीक्षक वैशाली सूळ यांचे निलंबन केले आहे.
निलंबन काळात सूळ यांना कोणत्याही प्रकारची खजगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. याबाबतचे प्रमाणपत्र देऊन निर्वाह भत्त्याची रक्कम स्वीकारावी लागेल, असे आदेशात नमूद केले आहे. तसेच निलंबन काळात मुख्यालय सोडून जायचे असेल तर अपर पोलीस आयुक्त प्रशासन व पोलीस उप आयुक्त मुख्यालय यांची परवानगी घ्यावी लागेल.
हे देखील वाचा :-
धक्कादायक : प्रेयसीला मिठी मारून प्रियकराने घेतले जाळून..दोघेही गांभीर जखमी…