लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पालघर : जिल्यातील वाढत्या कुपोषण आणि बालमृत्यूच्या पार्श्वभूमिवर राज्याच्या आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी सोमवारी वाडा तालुक्यातील एका अतितीव्र कुपोषित (SAM) मुलाच्या घरी भेट दिली असता धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे.
वाडा येथील बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका यांच्यासह जवळच्या एका अंगणवाडी केंद्रातील SAM बालकाच्या घरी भेट दिली असता, केळी, राजगिऱ्याचे लाडू आणि पाकिटबंद पौष्टिक अन्न (EDNF) आढळून आले व मुलाला नियमित महिन्याला १६ अंडी दिली जात असल्याचे अंगणवाडी सेविका आणि मुलाच्या आईने सांगितले. परंतु याबाबत पडताळणी केली असता सदर वस्तू तेथील अंगणवाडी सेविकेने काही वेळापूर्वी आणून दिल्या होत्या हे उघड झाले. तसेच सदर मुलाला दिला जाणारा पोषण आहार, अंडी तसेच इतर किराणा सामान, जीवनावश्यक वस्तू देखील घरात आढळले नाही. यावेळी अंगणवाडी सेविकेने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे विवेक पंडित यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
पालघर जिल्ह्यात एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत ४० बालमृत्यू आणि ५ माता मृत्यू झाल्याची आकाडेवारी प्रसारमाध्यमांतून समोर आली. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका आदिवासी भागाला बसला असताना बालमृत्यू व माता मृत्यूच्या वाढत्या संख्येची दखल घेत विवेक पंडित गाव- पाड्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा तालुकावार आढावा घेत आहेत.
आज वाडा शहरापासून जवळ असलेल्या एका SAM मुलाच्या घरी विवेक पंडित यांनी भेट दिली. यावेळी सदर मुलाचे पालक तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका उपस्थित होते. त्यावेळी बालकाच्या मातेला तिचे मुल कुपोषणात असल्याचे विचारले असता तिला ते माहीत असल्याचे मान्य केले. नंतर तिला आहाराबद्दल विचारणा करण्यात आली. तिने १६ अंडी दिली जातात असे सांगितले. अंगणवाडी सेविका यांनी दर आठवड्याला ४ अंडी दिले जातात असे सांगितले, लाभार्थीने सांगितल्याप्रमाणे सदरील लाभार्थी दि. २ जून २०२१ रोजी वीटभट्टी वरून परत आलेला आहे. दि. ३ जून २०२१ रोजी तिला ४ अंडी देण्यात आली तसेच दि. ५ जून २०२१ किंवा दि. ६ जून २०२१ तारखेला ८ अंडी दिल्याचे सांगितले नंतर जाऊबाई सोबत चार अंडी दिल्याचे लाभार्थ्यांच्या आईने सांगितले सद्यस्थितीमध्ये घरामध्ये अंडी नव्हती. यानंतर THR बाबत विचारणा केली असता THR जून पर्यंत मिळाल्याचे लाभार्थ्यांच्या आईने सांगितले. घरामध्ये THR मधले फक्त चणे अर्धा किलो पेक्षा जास्त आढळून आले. THR मधील इतर घटक घरामध्ये काहीही शिल्लक नव्हते. लाभार्थ्याला पाकिटबंद पौष्टिक अन्न (EDNF) व केळी बाबत विचारणा केली असता काल (दि. ४ जुलै २०२१) मिळाल्याचे सांगितले. परंतु चौकशी केली असता असे लक्षात आले की EDNF दि. ५ जुलै २०२१ रोजी देण्यात आलेली आहेत.
सदरील अंगणवाडी सेविका हिने खोटे सांगितल्या बाबत विवेक पंडित यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. पर्यवेक्षिका यांनी सदरील अंगणवाडी केंद्राला भेट दिलेली नाही. याबाबत विचारणा केली असता पर्यवेक्षिका यांनी अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे अंगणवाडी केंद्र ठुणावे येथे भेट देता आली असे सांगितले. त्यामुळे अशी जर परिस्थिती असेल तर आदिवासी बालके जीवंत आहेत ही केवळ परमेश्वराची कृपा असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया विवेक पंडित यांनी दिली.
सदर प्रकाराबाबत विवेक पंडित यांनी सदोष धोरण आणि संवेदन हीन अंमलबजावणी यामुळे कुपोषण आणि बालमृत्यु वाढल्याचे सांगितले. शिवाय“यापुढे अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी देखील कुपोषणाबाबत आहे त्या परिस्थितील संवेदनशीलपणे आपापले कार्य करावे. तसेच खरी माहिती देण्यात यावी जेणेकरून त्यावर योग्य तोडगा काढता येईल” अशी सूचना केली.
हे देखील वाचा :
दिलासादायक! Paytm कंपनीकडून वापरकर्त्यांसाठी खास सुविधा; त्वरित मिळेल ६० हजार रुपयांपर्यंत कर्ज
दिलासादायक! इंग्रजी शाळेच्या फी मध्ये २५ टक्के कपात; मेस्टा संघटनेचा मोठा निर्णय
नवेगाव नागझिरात आढळला काळा बिबट्या; प्रथमच दिसले नर-मादी एकत्र