लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
अहेरी, दि. २८ जानेवारी : अहेरी तालुक्यातील वेलगूर टोला गावानजीक अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे.
अपघातात मृत झालेल्याची नवे रवी किष्टे (21), रा. परभणी व धोंडिबा पवार (22) रा. नांदेड असे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रवी किष्टे हे पोस्टमन, तर धोंडिबा पवार हे पोस्टमास्तर होते. अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा पोस्ट ऑफिसअंतर्गत कम्मासूर येथे रवी किष्टे हे पोस्टमन, तर धोंडिबा पवार हे पोस्टमास्तर म्हणून चार महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते.
29 ते 30 जानेवारी या कालावधीत गडचिरोली येथे प्रशिक्षण असल्याने रवी किष्टे, धोंडिबा पवार हे अन्य सहकाऱ्यांसह आज दुपारी सहा मोटारसायकलींनी गडचिरोली येथे जात होते. पाच मोटारसायकली पुढे निघून गेल्या. परंतु रवी किष्टे आणि धोंडिबा पवार हे बरेच मागे राहिले. ते का आले नाहीत म्हणून अन्य सहकाऱ्यांनी मागे जाऊन बघितले असता दोघेही अपघातात ठार झाल्याचे निदर्शनास आले. अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघेही ठार झाल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
आलापल्ली ते आष्टी मार्गाची दुरावस्था झाल्याने आणि जड वाहनांचा वर्दळ असल्याने मागील एक वर्षांपासून अल्लापल्ली ते मुलचेरा या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. आलापल्ली ते मुलचेरा मार्गावर मागील काही दिवसापूर्वी नव्याने डांबरीकरण करण्यात आले. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत झाला आहे. असे असले तरी या रस्त्याच्या साईड बंब भरण्यात आले नसल्यामुळे सदर रस्त्यावरून आमने-सामने येणाऱ्या दोन वाहनांना रस्ता क्रॉस करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे दुरुस्तीनंतरही साईड बंबचा कामाअभावी हा रस्ता जीवघेणा ठरत असल्याची ओरड या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
हे देखील वाचा :
अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन, शिक्षण क्षेत्रात शोककळा