लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आसाम 7 जुलै :- आसाममध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे येथील जनजिवन विस्कळीत झालेय. मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. पूरस्थितीमुळे लाखो लोकांना घरदार सोडावं लागत आहे. आतापर्यंत पावसामुळे आणि दरड कोसळून तब्बल 186 जणांचा मृत्यू झालाय. तर अनेकजण बेपत्ता आहेत. आसाममधील 16 जिल्ह्यातील जवळपास 11 लाख लोकांना या पूरस्थिताचा फटका बसलाय.
पुरामुळं शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. रस्ते पाण्याखाली गेल्यानं, नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणं देखील कठीण झाल आहे. दरम्यान, भारतीय लष्कराकडून सातत्याने मदत आणि बचावकार्य सुरु आहे. घरामध्ये पाणी गेल्यामुळे संसार उघड्यावर आलाय.
आसाममध्ये पुराच्या पाण्यामुळं 79 रस्ते आणि पाच पुलांचं मोठं नुकसान झालं आहे. तर सहा बंधारे तुटले आहेत. आसाममध्ये आलेल्या पुरामुळे 74 हजार 655 हेक्टरवरील पीक क्षेत्र अजूनही पाण्याखाली आहे. आतापर्यंत 2 हजार 774 जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता आमिर खान यानं या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री मदत निधीला 25 लाख रुपयांची देणगी दिली.