- सुंदर ९६ धावांवर नाबाद, इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवात
- इंग्लंडच्या लंचपर्यंत तीन षटकांत ६ धावा
वृत्तसंस्था, दि. ६ मार्च: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये सुरु असलेल्या अखेरच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियानं पहिल्या डावात इंग्लंडविरोधात १६० धावांची मोठी आघाडी घेतली आहे.
ऋषभ पंतनंतर वॉशिंग्टन सुंदरच्या शानदार खेळीच्या बळावर टीम इंडियानं 365 अशी धावसंख्या उभारली. सुंदरला अक्षर पटेलनं चांगली साथ दिली. मात्र अक्षर बाद झाल्यानंतर आलेल्या इशांत आणि सिराज झटपट बाद झाल्यानं सुंदरचं पहिलं कसोटी शतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. सुंदर 96 धावांवर नाबाद राहिला. त्याला अक्षरनं 43 धावा करत चांगली साथ दिली.
टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांवर आटोपला. ज्यानंतर पहिला डाव खेळण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही. दुसऱ्या दिवशी मात्र भारताचा डाव काहीसा सावरताना दिसला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी 94 षटकांच्या खेळामध्ये भारतीय संघाची धावसंख्या 7 गडी बाद 294 धावा इतकी होती. यामध्ये वॉशिंग्टन सुंदर यानं 60 धावांचं योगदान दिलं होतं. तर, त्याची साथ घेत ऋषभ पंतनं चौथ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस गाजवला. शतकी खेळी केल्यानंतर 101 वी धाव करत ऋषभ पंत झेलबाद झाला.
पंतचं हे कसोटी क्रिकेटमधील तिसरं शतक ठरलं तर, भारतीय भूमीत त्यानं केलेलं हे पहिलं कसोटी शतक ठरलं. दरम्यान, दुसऱ्या दिवसअखेर वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल हे खेळाडू खेळपट्टीवर अनुक्रमे 60 आणि 11 धावांसह टिकून होते. आज सुंदर 96 धावांपर्यंत पोहोचला मात्र त्याला शतक करता आलं नाही. आता भारताकडे एकूण 160 धावांची आघाडी आहे.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात
इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात झाली आहे. डॉम सिबली आणि झॅक क्रॉली सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. इंग्लंडने लंच होईपर्यंत तीन षटकांत ६ धावा केल्या आहेत. इंग्लंड अद्यापही १५४ धावांनी पिछाडीवर आहे.