१००० वर्षांहून अधिक काळ टिकणार अयोध्येतील राम मंदिर, संपूर्ण दगडाने बांधणार

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी फक्त दगडांचाच वापर करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली आहे. दगडांनी बांधलेले मंदिर हजार वर्षांहून अधिक काळ राहील, असे चंपत राय यांचे म्हणणे आहे.

चंपत राय हे विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा आहेत. मंदिर बांधकाम प्रक्रियेत आयआयटी-चेन्नई आणि केंद्रीय इमारत संशोधन संस्था (सीबीआरआय) च्या सदस्यांशीही सल्लामसलत केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

चंपत राय यांनी गुरुवारी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी राम मंदिराचे बांधकाम लार्सन अँड टूब्रो कंपनी करणार आहे. आयआयटी-चेन्नईचे अभियंते येथील जमिनीच्या क्षमतेची पाहणी करतील. तर, मंदिरातील भूकंप प्रतिरोधक करण्यासाठी सीबीआरआयच्या लोकांचा सल्ला घेतला जात आहे, असे चंपत राय यांनी सांगितले.

याचबरोबर, मंदिराच्या बांधकामात सुमारे १० हजार तांब्याचे रॉड वापरले जातील. जर लोकांना मंदिर बांधकामासाठी मदत करायची असेल तर ते तांबे दान करू शकतात, असे चंपत राय म्हणाले. याशिवाय, राम मंदिर दगडांनी अशा प्रकारे बांधले जाणार आहे. ज्यामुळे वारा, पाणी आणि सूर्यप्रकाशामुळे नुकसान होणार नाही आणि हजारो वर्षे मंदिर उभे राहील, असे चंपत राय यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यानंतर मंदिराच्या बांधकामाची तयारीही जोरात सुरू झाली आहे.

loksparshram mandir