लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अहेरी नगरपंचायतीचे कर निर्धारक अधिकारी वैभव पांढरे मारहाण प्रकरणात गेल्या ५२ दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार यांच्यासह अन्य तीन आरोपींना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. अहेरी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश-२ रोहन रेहपाडे यांनी डॉ. अजय कंकडालवार, अजय नैताम, श्रीनिवास लक्ष्मण आणि इम्रान पठाण या चौघांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नियमित जामीन मंजूर केला.
१० जून रोजी नगरपंचायतीचे कर निर्धारक अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या कथित मारहाणीनंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. या घटनेमुळे अहेरीसह जिल्हाभरात मोठी चर्चा रंगली होती. शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांनीही या घटनेचा निषेध नोंदवत कठोर कारवाईची मागणी केली होती.
जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने नागपूरचे वरिष्ठ अधिवक्ता तथा माजी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध चांदेकर आणि अहेरीचे वरिष्ठ अधिवक्ता सतीश जैनवार यांनी युक्तिवाद केला. सरकार पक्षानेही न्यायालयासमोर आपली बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने चौघांनाही नियमित जामीन मंजूर केला.
न्यायालयाच्या निर्णयाची माहिती मिळताच अहेरी शहरात डॉ. कंकडालवार यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.