सोनिया सेना आणखी किती गळे दाबणार? – कंगना राणावत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई 4 नोव्हेंबर:- रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात ताब्यात घेतले आहे. त्यानंतर विरोधकांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे. या वादात आता अभिनेत्री कंगना राणावत हिने उडी घेतली आहे. अनेक विषयांवरुन ती वारंवार राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट करताना दिसत आहेच. या प्रकरणावरुन तिने एक व्हिडिओ ट्विट केला आहे.

कंगना म्हणाली की, “मी महाराष्ट्र सरकारला एक विचारु इच्छिते की अर्णब गोस्वामी यांच्या घरी जाऊन पोलिसांनी त्यांना मारहाण केली. त्यामुळे आणखी किती घरं तुम्ही तोडणार आहात? आणि किती जणांचे गळे दाबण्याचे आहात? आणि किती जणांचे आवाज बंद करणार आहात? सोनिया सेना आणखी किती जणांची तोंडं बंद करणार? एक आवाज बंद  केला तर दुसरा आवाज येईल. आणि तुम्हाला राग कसला येतो? पेंग्विन म्हटल्याचा राग येतो? आता पेंग्विन दिसत असेल तर बोलणार. पप्पू सेनेसारखे काम केले तर पप्प सेना बोलणारचं आणि तुम्ही सोनिया सेना आहात”, असे ट्विट कंगनाने केले आहे.  कंगनाने नाव न घेता मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.