लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर, दि. ५ मार्च : चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला आज एक उपयोगी वाहन भेट स्वरूपात मिळाले. या वाहनाचा उपयोग करून जंगलाच्या दुर्गम भागात जाऊन समस्याग्रस्त वन्यजीवाला जवळून बेशुद्ध करता येण्याची सोय झाली आहे. वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षात हे वाहन विशेष सहाय्यभूत ठरणार आहे.
या खास रचना केलेल्या चारचाकी वाहनात बचाव दलाच्या सुरक्षेची खास काळजी घेण्यात आली आहे. असे पहिले वाहन ताडोबाच्या सेवेत दाखल दाखल झाले असून या वाहनांची उपयोगिता पाहून अन्य व्याघ्र प्रकल्पात अशी वाहने समाविष्ट केली जाणार आहेत. मानव-वन्यजीव संघर्षामुळे अनेक वेळा वाघांना जेरबंद करणे आवश्यक असते. मात्र वाघ पकडण्याची ही मोहीम अनेक वेळा दीर्घकाळ चालते.
यामुळे श्रम-पैसा आणि वेळ यांचा खूप अपव्यय होतो. सोबतच वाघ पकडायला वेळ लागल्यास ती वाघ किंवा माणसांच्या जीवावर बेतू शकते. वाघ पकडण्यासाठी सध्याची प्रचलीत पद्धत म्हणजे वाघाला डार्ट मारून बेशुद्ध करणे. यासाठी पाळीव प्राणी एखाद्या ठिकाणी बांधून वाघ त्या पाळीव प्राण्याची शिकार करेल याची वाट पहावी लागते. मग वाघ ती शिकार खाण्यात गुंग असला की त्याला डार्ट मारला जातो.
मात्र वाघ जर आक्रमक झाला किंवा तो जर अडचणींच्या जागेवर असेल तर त्याला डार्ट मारता येत नाही. मात्र आता या समस्येवर उपाय म्हणून हे विशेष वाहन design करण्यात आले आहे. या वाहनांच्या सहाय्याने थेट वाघ जिथे आहे तिथे जाऊन त्याला बेशुद्ध करता येणार आहे. हे वाहन जंगलातल्या कुठल्याही दुर्गम भागात, कुठल्याही ऋतूत काम करू शकणार आहे.
हे देखील वाचा :
युक्रेनमधल्या नागरिकांसाठी रशियाचा मोठा निर्णय, 6 तासांसाठी युद्धविराम घोषित
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला कायदा-सुव्यवस्था स्थितीबाबत आढावा