Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर 77 सराईत गुन्हेगार हद्दपार – गडचिरोली पोलिसांची कठोर कारवाई, नागरिकांना शांततेचे आवाहन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली: गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या दोन्ही महत्त्वाच्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलिसांनी कठोर आणि वेधक पावले उचलली आहेत. नागरिकांनी शांतता, बंधुता आणि सौहार्दपूर्ण वातावरणात उत्सवाचा आनंद घ्यावा यासाठी 77 सराईत गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई भारतीय न्याय संहिता कलम 163(2) अन्वये करण्यात आली असून, जिल्हाभरात यामुळे कायद्याचा धाक आणि पोलिसांची सजगता अधोरेखित झाली आहे.

हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये कुरखेडा पोस्टेअंतर्गत 5, वडसा 11, कोरची 3, गडचिरोली 9, आरमोरी 19, चामोर्शी 4, अहेरी 11, मुलचेरा 5, आष्टी 9 व रेपनपल्ली उपपोस्टेअंतर्गत 1 गुन्हेगाराचा समावेश आहे. या सर्व आरोपींवर यापूर्वी कायदा व सुव्यवस्थेचा भंग, अवैध धंदे, मारामाऱ्या, धमक्या तसेच समाजातील शांततेला तडा देणारे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सणासुदीच्या काळात अशा प्रवृत्तीमुळे नागरिकांच्या सुरक्षेस धोका निर्माण होऊ नये, उत्सवांवर विघ्न येऊ नये आणि कोणत्याही प्रकारची अशांतता पसरू नये या दृष्टीने पोलिसांनी ही निर्णायक कारवाई केली आहे. जिल्हा पोलिसांची ही भूमिका नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक “सणासुदीचा कवच” असल्याचा भक्कम संदेश या कारवाईतून दिला गेला आहे.

या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी नागरिकांना शांततेत, परस्पर बंधुतेत आणि सामाजिक सौहार्दात उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. “कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नका, कायद्यावर विश्वास ठेवा, आम्ही आपल्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत,” असे स्पष्ट शब्दांत सांगत पोलिसांनी नागरिकांमध्ये विश्वासाचा किरण निर्माण केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोलीच्या संवेदनशील जिल्ह्याने वारंवार कायदा व सुव्यवस्थेच्या कसोट्या पाहिल्या आहेत. मात्र यावेळी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे हे तात्काळ व कठोर पाऊल म्हणजे एक प्रकारचा इशारा आहे— गुन्हेगारी प्रवृत्ती सहन केली जाणार नाही आणि सामान्य नागरिकांचा आनंद हिरावून घेणाऱ्यांना जिल्ह्याच्या सीमारेषेपलीकडेच फेकून दिले जाईल.

हा संदेश जितका गुन्हेगारांसाठी धोक्याचा आहे तितकाच तो सामान्य नागरिकांसाठी आश्वासक आहे. कारण शेवटी उत्सव म्हणजे शांतता, आनंद आणि बंधुत्वाचा पर्व. आणि त्या पर्वाला पोलिसांच्या सजगतेने संरक्षण मिळाल्याने यंदाचे उत्सव अधिक सुरक्षिततेच्या आणि आत्मविश्वासाच्या छायेत साजरे होतील.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.