SRPF भरतीत धावताना युवकाचा हृदयविकाराने मृत्यू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न डोळ्यांत घेऊन धावणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाचा भरतीच्या धावपट्टीवरच दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी सकाळी देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथे घडली. आशिष भास्कर म्हशाखेत्री (रा. देलोडा बुज, ता. आरमोरी) असे मृत उमेदवाराचे नाव असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राज्य राखीव पोलीस बलाच्या भरती प्रक्रियेअंतर्गत विसोरा येथील कवायत मैदानावर शारीरिक चाचण्या सुरू आहेत. भारत राखीव बटालियन-४ अंतर्गत गट क्र. १७, चंद्रपूर येथील सशस्त्र पोलीस शिपायांच्या २४४ रिक्त पदांसाठी ही भरती होत आहे. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आशिष धावण्याच्या चाचणीत सहभागी झाला होता. अंतिम टप्प्यात, धावपट्टीची सीमारेषा ओलांडण्याच्या काही क्षणांपूर्वीच तो अचानक कोसळला.
घटनेनंतर मैदानावर उपस्थित वैद्यकीय पथकाने तत्काळ धाव घेत त्याला प्राथमिक उपचार दिले आणि देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच अवघ्या काही मिनिटांत त्याचा मृत्यू झाला. तो शुद्धीवर येऊ शकला नसल्याने मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, अचानक आलेला शारीरिक ताण, हृदयविकाराचा झटका किंवा निर्जलीकरण यांसारख्या कारणांची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांवर येणारा प्रचंड शारीरिक व मानसिक ताण या घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दररोज सुमारे हजारो उमेदवार चाचणीसाठी उपस्थित राहत असून, पहाटे २ वाजल्यापासूनच मैदानाबाहेर रांगा लागतात. अपुरी झोप, अपूर्ण आहार आणि स्पर्धेचा तीव्र दबाव यामुळे उमेदवारांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी प्रशासनाने चाचणीची वेळ पहाटे निश्चित केली असली, तरी प्रत्यक्षात वाढती गर्दी आणि व्यवस्थापनावरील ताण यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय सुविधा आणि सीसीटीव्ही देखरेखीची व्यवस्था असली, तरी त्या पुरेशा ठरत आहेत का, असा प्रश्न या घटनेने उपस्थित केला आहे.
आशिषच्या आकस्मिक निधनामुळे आरमोरी तालुक्यातील देलोडा परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

