MPSC औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; फेरपरीक्षा होणार..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक, गट-ब या पदासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या प्राथमिक चौकशीत एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याचा लाभ झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. परीक्षेची गोपनीयता, पारदर्शकता, निष्पक्षता आणि आयोगावरील उमेदवारांचा विश्वास कायम राखण्यासाठी ही संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे.

आयोगाने २९ जुलै २०२५ रोजी अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब या संवर्गातील पदांसाठी जाहिरात क्रमांक ११६/२०२५ प्रसिद्ध केली होती. त्यानुसार २२ मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने चाळणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल १२ जून २०२६ रोजी जाहीर करण्यात आला होता.

चाळणी परीक्षेअंती ५०६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. यापैकी ४८८ उमेदवारांच्या मुलाखती १ जुलै ते २२ जुलै २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या. २२ जुलै रोजी सायंकाळी मुलाखती संपल्यानंतर औषध निरीक्षक पदासाठी ४८५ पात्र आणि तीन अपात्र अशा एकूण ४८८ उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादीही आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असतानाच परीक्षेतील गैरप्रकाराच्या तक्रारींमुळे संपूर्ण प्रक्रियेला ब्रेक लागला.

दरम्यान, २२ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत आयोगाला काही उमेदवार तसेच लोकप्रतिनिधींकडून ई-मेलद्वारे गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या. २२ मार्च रोजी झालेल्या चाळणी परीक्षेपूर्वीच काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका अथवा प्रश्न मिळाले होते आणि ही प्रश्नपत्रिका सोशल मीडिया तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आली होती, असा दावा या तक्रारींमध्ये करण्यात आला होता.

तक्रारींचे गांभीर्य आणि प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २७ जुलै २०२६ रोजी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस उपआयुक्त, गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस आयुक्त कार्यालय, मुंबई यांनी प्राथमिक चौकशी करून त्याचा अहवाल आयोगाला सादर केला.

गुन्हे अन्वेषण शाखेने सादर केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालानुसार एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याचा लाभ झाल्याचे चौकशीत प्रथमदर्शनी दिसून आले आहे. त्यामुळे परीक्षेची गोपनीयता, अखंडता, पारदर्शकता आणि निष्पक्षता अबाधित ठेवण्याबरोबरच सर्वसामान्य उमेदवारांचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगावरील विश्वास कायम राखण्यासाठी आयोगाने औषध निरीक्षक पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांना मोठा धक्का बसला असला तरी आयोगाने त्यांना फेरपरीक्षेच्या माध्यमातून पुन्हा संधी दिली आहे. औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन या संवर्गातील संबंधित पदांसाठी आयोगाकडून फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच फेरपरीक्षेसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

फेरपरीक्षेची तारीख, परीक्षा केंद्रे आणि अन्य आवश्यक तपशील स्वतंत्र प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता हजारो उमेदवारांचे लक्ष या फेरपरीक्षेच्या वेळापत्रकाकडे लागले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळून त्याचा लाभ झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा आयोगाचा निर्णय हा परीक्षा प्रक्रियेची निष्पक्षता कायम ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. आता फेरपरीक्षा कोणत्या पद्धतीने आणि किती कालावधीत घेतली जाते, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

MPSC Exam
Comments (0)
Add Comment